मुंबई : “विकासाची भारतीय संकल्पना सर्वांगीण व निसर्गाशी सुसंगत आहे. विकासाच्या पाश्चात्य मॉडेल्समुळे निसर्ग आणि पर्यावरणाची मोठी हानी झाली. आपण स्वतःचे विकासाचे मॉडेल विकसित केले पाहिजे, ज्याचे जग अनुसरण करू शकेल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ( Dr. Mohanji Bhagwat ) यांनी केले.
भारतीय शिक्षण मंडळाच्यावतीने ‘व्हिजन फॉर विकसित भारत’ ही अखिल भारतीय संशोधक परिषद दि. १५ ते दि. १७ नोव्हेंबर या कालावधीत एसजीटी विद्यापीठ, गुरुग्राम, हरियाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतकेंद्रित संशोधनाला प्रोत्साहन देऊन तरुणांमध्ये संशोधन कार्याबाबत जागरूकता आणण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. यावेळी भारतीय शिक्षण मंडळाच्या ’प्रज्ञानम्’ या संशोधन मासिकाचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले.
सरसंघचालक यावेळी म्हणाले की, “सर्वसमावेशकता ही भारताची खासियत आहे. प्रत्येक भारतीयाला स्वतःचा भारत, विकसित भारत, सक्षम भारत हवा आहे. गेल्या हजारो वर्षांत विकासाचे अनेक प्रयोग झाले. त्याची अपूर्णता लोकांच्या लक्षात आली. या अपयशांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे पाहत आहे. १६व्या शतकापर्यंत भारत हा सर्व क्षेत्रात अग्रेसर देश होता. विकास म्हणजे केवळ संपत्ती आणि काम मिळवणे नव्हे. त्याला विरोध नाही. पण, आध्यात्मिक आणि भौतिक समृद्धी या दोन्ही गोष्टी एकत्रच जायला हव्यात. आमचा स्वभावच असा आहे की, आमचा पेटंटवर विश्वास नाही. प्रत्येकाला ज्ञान असले पाहिजे; परंतु, त्या ज्ञानाचा वापर हुशारीने करा.”
विकसित भारताची संकल्पना साकार करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले. मिशन चांद्रयानच्या यशाचा संदर्भ देत पुढे ते म्हणाले की, “२०४० सालापर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणे आणि स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भारताची ‘विश्वगुरू’ची संकल्पना प्रत्यक्षात आणून आपण असा भारत घडवायचा आहे, जेणेकरून इथले लोक आनंदाने राहतील.
पाच लाख संशोधक व एक लाख शिक्षक/शिक्षणतज्ज्ञांशी संपर्क
’विविभा २०२४’ यशस्वी करण्यासाठी, भारतीय शिक्षण मंडळ-युवा आयामने पाच लाख संशोधक आणि सुमारे एक लाख शिक्षक/ शिक्षणतज्ज्ञांशी संपर्क साधला. या कालावधीत एकूण ३५० संशोधन शिबिरे घेण्यात आली. संस्थेने शोधनिबंध लेखन स्पर्धाही आयोजित केली, ज्यामध्ये १ लाख, ६८ हजार, ७७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ४५ मूल्यमापन समित्या आणि १ हजार, ४०० विषय तज्ज्ञांनी केलेल्या मूल्यमापनानंतर विविध राज्यांतील संशोधकांचे १ हजार, २०० शोधनिबंध ‘विविभा २०२४’ साली सहभागी होण्यासाठी निवडले गेले.