ठाणे : “मुंब्रा-कळव्यातून एकाला १५ वर्षे संधी दिलीत, त्याने वीज चोरी केली. आता राष्ट्रवादी-महायुतीच्या नजीब मुल्ला यांना निवडून द्या. मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईन, हा माझा वादा आहे,” असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी मतदारांना केला.
“मुंब्रा-कळवा टोरन्ट मुक्त व ड्रग्ज मुक्त करून दाखवणार,” असे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ मुंब्रा येथे शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या सभेला लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती.
शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस आहे. यामुळेच विधानसभा निवडणुकीत दहा टक्के मुस्लीम उमेदवारांना संधी दिली. राज्यातील अल्पसंख्याक समाज वंचित राहू नये म्हणून ‘मार्टी’ची स्थापना केली आहे. संभाजी नगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय उभारले. अल्पसंख्याक समाजातील मुलांनी अधिकचे शिक्षण घ्यावे, यासाठी प्रत्येक मुलाला परदेशी शिक्षणाकरिता पाच लाखावरून ३० लाख शिष्यवृत्ती दिली. ‘वक्फ बोर्ड’च्या कार्यालयाची संख्या वाढविण्यासाठी जागेचे प्रावधान करीत आहे. “मागील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे व मी मिळून कळवा मुंब्रा मतदासंघांच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. घड्याळाला मत म्हणजे राज्याच्या विकासाला मत,” अशी घोषणा अजित पवार यांनी केली.