सज्जाद नोमानींच्या 'त्या' व्हिडीओवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "देशाच्या इतिहासात..."

16 Nov 2024 13:15:19
 
Fadanvis
 
मुंबई : महाविकास आघाडी धर्माचा वापर करून वोट जिहाद करत आहे. देशाच्या इतिहासात निवडणूकीमध्ये इतके लांगूलचालन आम्ही बघितले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सज्जाद नोमानी यांचा वादग्रस्त व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून यावर राजकारण तापले आहे.
 
याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहेत, हे अतिशय खेदजनक आहे. सज्जाद नोमानी आणि उलेमा बोर्डने महाविकास आघाडीकडे १७ मागण्या केल्या होत्या. या मागण्या खूप भयानक आहेत. मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्या, २०१२ ते २०२४ महाराष्ट्रात झालेल्या दंगलींमधील मुस्लिम आरोपींचे सगळे गुन्हे मागे घ्या, आरएसएसवर बंदी आणा, अशा मागण्या त्यांनी केल्या. या तिन्ही पक्षांनी त्यांना पत्र देऊन त्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले."
 
हे वाचलंत का? -  भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याची भाषा!
 
"त्यानंतर आता सज्जाद नोमानी वोट जिहाद करण्यास सांगत आहेत. आमच्या वोट जिहादचे खाला सिपेसालार शरद पवार आहेत आणि सिपेसालार उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले आहेत, असे सज्जाद नोमानी सांगताहेत. या देशाच्या इतिहासात निवडणूकीमध्ये इतके लांगूलचालन आम्ही बघितले नाही. एक प्रकारे केवळ अल्पसंख्यांक मते मिळवण्यासाठी जर महाविकास आघाडी काम करत असेल तर त्यांच्याविरुद्ध निश्चितपणे आपल्या सगळ्यांना एक व्हावेच लागेल. त्यानंतर जर मुठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता, असे तुम्हाला वाटत असेल तर बहुसंख्य मतांनादेखील एक होऊन पुनर्विचार करावा लागेल," असे आवाहन त्यांनी केले.
 
फक्त जातीवाद करून निवडणूक जिंकण्याचा मविआचा प्रयत्न!
 
"यापेक्षाही भयानक नोमानींचा एक दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. मुस्लिम समाजातील ज्या लोकांनी लोकसभेत भाजपला मतदान केले त्यांना शोधून काढा आणि त्यांचा दानापाणी बंद करा. तसेच त्यांना सोशल बॉयकॉट करा, असे ते यात म्हणतात. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे लोक आज या सगळ्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नाला आम्ही नक्की उत्तर देऊ. काँग्रेस लोकांना आज जातीजातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे निवडणूकीला मुद्दा उरलेला नसल्याने फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," अशी टीकाही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0