ईडीने फाडला ‘व्होट जिहाद’चा बुरखा; १२५ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार उघड

14 Nov 2024 18:32:30

ED
 
नवी दिल्ली : (ED) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने देशविरोधी ‘व्होट जिहाद’चा कणा मोडून मालेगाव, नाशिक आणि मुंबईसमध्ये छापेमारी केली आहे. यावेळी ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात येणाऱ्या १२५ कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचा बुरखा फाडण्यात आला आहे.
 
ईडीने ‘व्होट जिहाद’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २४ ठिकाणी छापे टाकले आहेत. हे प्रकरण प्रामुख्याने बनावट कागदपत्रे आणि बनावट केवायसी (नो युवर कस्टमर) द्वारे मोठ्या प्रमाणावर बँक खाती उघडण्याशी संबंधित आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषत: आर्थिक फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात बँक खाती बेकायदेशीरपणे उघडण्याच्या प्रकरणात हे छापे टाकले आहेत.
 
ईडीच्या तपासात असे आढळून आले आहे की बनावट कागदपत्रे आणि बनावट केवायसीद्वारे अनेक बँक खाती उघडण्यात आली होती. या खात्यांचा वापर ‘व्होट जिहाद’साठी करण्यात आला असून निवडणुकीत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. अशा वेळी बँकिंग व्यवस्थेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधी आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा तपास यंत्रणेस संशय आहे.
 
ईडीने अहमदाबादमधील १३ ठिकाणे, सुरतमधील तीन परिसर, मालेगाव, नाशिकमधील दोन परिसर आणि मुंबईतील पाच परिसरांमध्ये छापेमारी केली आहे. मतदारांना खरेदी करण्याच्या पद्धतींशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित पुरावे उघड करणे हे कारवाईचे उद्दिष्ट आहे. सूत्रांनी सूचित केले आहे ईडीने आपल्या कारवाईमध्ये आर्थिक व्यवहार, संभाव्य लाच आणि मतदारांवर प्रभाव पाडण्याशी जोडलेले इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित सामग्री शोधण्यावर विशेष भर दिला आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने तब्बल १२५ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार करण्यात आले असावे. आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींच्या खात्यांचा गैरफायदा घेऊन पैशांची अफरातफर करणाऱ्या संशयितांच्या बँक खात्यांना लक्ष्य करून ईडीने हे छापे टाकले. संशयितांवर बेकायदेशीर निधी लपवण्यासाठी आणि शोध टाळण्यासाठी या खात्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर पैशांचा प्रवाह शोधणे आणि या बँक खात्यांचा किती प्रमाणात गैरवापर झाला हे उघड करणे हे तपासाचे उद्दिष्ट आहे, असे छापेमारीशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
 
या प्रकरणाबाबत तपास यंत्रणेने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व बाजूंचा तपास केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे त्यांचा तपासात समावेश केला जाईल. याशिवाय फसवणुकीचा हा प्रकार रोखण्यासाठी बँकिंग आणि इतर वित्तीय संस्थांकडूनही कडक देखरेख अपेक्षित असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0