मुंबई : सकाळी ९ च्या भोंग्याला आता कसं वाटतंय? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना केला आहे. हरियाणामध्ये भाजपने बहुमत मिळवत विजयाची हॅट्रिक केली. दरम्यान, महाराष्ट्रातही या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला फेक नॅरेटिव्हने हरवलं होतं. ज्यादिवशी हे लक्षात आलं त्यादिवशी आपण महाराष्ट्रासह देशभरात या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याचं ठरवलं. पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती."
"हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासूनच स्क्रिप्ट लिहून बसले होते. सकाळी ९ वाजता बोलणारा भोंगा रात्रीपासून स्क्रिप्ट तयार करुन बसला होता. काय काय बोलू आणि काय नाही असं त्यांना वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आहे आता कसं वाटतंय? जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेल्या लोकांना आता जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज हरियाणात जे घडलं ते येत्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे," असेही ते म्हणाले.