डोळा हे पंचेंद्रिय कायम दुर्लक्षित राहते. डोळ्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याची आब राखली जात नसल्याने डोळ्यांना काही व्याधी जडतात. यामुळे अनेकांना आपली दृष्टी गमवावी लागते. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन कर्जत तालुक्यात नेरळ येथे गेली ११ वर्षे नेत्रचिकित्सा आणि मोेफत मोतीबिंदू शिबिरे भरवणार्या नम्रता नितीन कांदळगावकर यांनी त्यांची ओळख सार्वजनिक दृष्टिदाता अशी निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्यावर टाकलेला हा कटाक्ष.
नम्रता कांदळगावकर यांनी पती नितीन कांदळगावकर यांच्या साथीने नेरळमध्ये गेल्या ११ वर्षांत १३४ नेत्रचिकीत्सा शिबिरे घेतली. या शिबिरांमध्ये सुमारे १५ हजारांहून अधिक लोकांनी तपासण्या केल्या. त्यांपैकी ७ हजार, ५०० हून अधिक रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हा उपक्रम व्रत म्हणून राबविल्याने नम्रता कांदळगावकर यांची कर्जत तालुक्यात ‘सार्वजनिक दृष्टिदाता’ अशी ओळख बनली आहे.
पद्मश्री अनिल पारकर ऊर्फ नम्रता नितीन कांदळगावकर यांनी बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयातून ‘बीकॉम’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी लहान मुलांच्या मानसिकतेचे समुपदेशन या विषयामध्ये पदवी संपादन केली. त्या ‘पार्थ एज्युकेशन ट्रस्ट’च्या संस्थापक अध्यक्षा आहेत. सामाजिक क्षेत्रात वावर असलेल्या नम्रता या कर्जत तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणार्या ओलमण येथे गेल्या असता, मोतीबिंदूमुळे गरीब आदिवासी बांधवांची दृष्टी गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यातच तालुक्यात आरोग्य सुविधा तितक्या प्रभावी नाही. अनेक दुर्गम आदिवासी गाव-पाड्यांपर्यंत आरोग्य यंत्रणाही नीट पोहोचू शकत नाहीत. ही बाब नम्रता कांदळगावकर यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली. त्यातच तालुक्यातील नागरिक विशेषतः गरीब, गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आदिवासी बांधवांना खासगी रुग्णालयांत उपचार करणे परवडणारे नाही. तसेच, मुंबई किंवा अन्य शहरांत जाऊन सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार करवून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याने मोफत नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रिया शिबिरे भरविण्याचा मानस त्यांनी पती नितीन यांना बोलून दाखविला आणि येथूनच या स्तुत्य उपक्रमाचा श्रीगणेशा झाला.
सुरुवातीला नेत्रचिकित्सा शिबीर भरवताना सर्वांत मोठे आव्हान जनजागृतीचे होते. आदिवासी बांधवांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेबद्दल फारशी माहिती नव्हती. शस्त्रक्रियेबद्दल त्यांचे अनेक गैरसमज होते. शस्त्रक्रियेमुळे आपले डोळे निकामी तर होणार नाहीत ना, ही भीती त्यांना सतावत होती. त्यावेळी नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी त्यांचे समुपदेशन करणे, त्यांच्यात जागृती करणे हे मोठे आव्हान होते. मग त्यांच्याशी बोलून, त्यांच्यातली भीती घालवल्याने ते शस्त्रक्रियेसाठी तयार झाले आणि शिबिरांचा हा उपक्रम कायम राहिला. त्यांनी गेल्या महिन्यात १३४वे शिबीर भरवले. दर महिन्याच्या तिसर्या बुधवारी नेरळ येथील कार्यालयात शिबीर घेतले जाते. तसेच, इतर वेळी तालुक्यात अन्य विभागांत ठिकठिकाणी मागणीनुसार शिबिरे भरवली जातात.
प्रत्येक शिबिरात १०० ते १२५ लोकांची तपासणी केली जाते. ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा रुग्णांना डॉ. हळदीपूरकर यांच्या पनवेल येथील ‘लक्ष्मी आय केअर’ आणि ‘आर. झुनझुनवाला’ यांच्या नवीन पनवेल येथील ‘संकरा आय हॉस्पिटल’ येथे नेले जाते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना २४ तास निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यांना कोणताही त्रास नाही, शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आहे, याची खात्री करूनच घरी आणले जाते. तसेच, शस्त्रक्रियेनंतर पुढील १५ दिवस त्यांची काळजी घेण्यासाठी पाठपुरावा केला जातो. त्यांची नेण्या-आणण्याची व्यवस्था मोफत केली जाते. आतापर्यंत या शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५ हजारांहून रुग्णांच्या तपासण्या झाल्या. तसेच, त्यांपैकी सुमारे ७ हजार, ५०० रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे नम्रता यांनी सांगितले.
“दुर्गम आदिवासी भागांतील नागरिकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी करू शकलो, याचे समाधान आहेच. परंतु, यामुळेच ‘सार्वजनिक दृष्टिदाता’ ही ओळख निर्माण झाली, ही या उपक्रमाच्या यशाची पोचपावती आहे,” असे नम्रता नम्रपणे सांगतात. त्या आशा वर्कर आणि घर कामगार महिला यांच्यासाठीही काही उपक्रम राबवतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे कायम म्हटले जाते. परंतु, गरीब, गरजूंसाठी मोफत नेत्रचिकित्सा आणि शिबिरे भरविताना नितीन यांनी नम्रता यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून यशस्वी स्त्रीच्या मागेही एक पुरुष असतो, एकमेकांना यशस्वी करण्यासाठी स्त्री-पुरुष परस्पर पूरक असतात, हे दाखवून दिले आणि हेच या उपक्रमाच्या यशाचे गमक असल्याचे नम्रता कांदळगावकर आवर्जून सांगतात. कर्जत तालुक्यात आरोग्य सुविधा सक्षम झाल्या पाहिजेत. येथे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त सुसज्ज रुग्णालये उभी राहिली पाहिजेत. आरोग्य सुविधांअभावी येथील नागरिकांना, रुग्णांना आपले जीव धोक्यात घालून शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारकडे पाठपुरावा करण्याचा त्यांचा मानस आहे. समाजात वावरताना प्रत्येकाने आपण समाजाचे काही देणे लागतो. आपली छोटीशी मदतही अनेकांसाठी खूप अमूल्य ठरू शकते, या भावनेतून प्रत्येकाने काम करावे आणि सतत कार्यरत राहावे, अशी नम्रता यांची धारणा आहे.