देवेंद्र फडणवीसांमुळे जिंकलो नायगाव ‘बीडीडी’च्या नामांतराची लढाई

07 Oct 2024 13:11:45

kalidas kolambkar
 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नायगाव (दादर) येथील बीडीडी चाळीला शरद पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. कालिदास कोळंबकर यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी उपोषणही केले. महायुती सरकार सत्तेवर येताच, त्यांनी या चाळीच्या नामांतरासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, नायगाव बीडीडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानिमित्ताने आ. कालिदास कोळंबकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला विशेष संवाद.
 
  • नायगाव बीडीडीला शरद पवारांऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करीत होता. त्याला अखेर यश आले. याबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया...
 
- व्यक्ती म्हणून मी शरद पवार यांचा आदर करतो. ते राजकारणाचे एक व्यासपीठ आहेत. परंतु, नायगाव बीडीडीला त्यांचे नाव देण्याचा जो प्रयत्न झाला, तो न पटणारा होता. माणूस हयात असताना एखाद्या प्रकल्पाला त्यांचे नाव देणे योग्य नाही. बाबासाहेबांच्या नावासाठी मी हट्ट धरण्यामागे एक विचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो अनुयायी या चाळीत राहतात. स्वतः बाबासाहेब दादर परिसरातील ‘राजगृह’ बंगल्यात वास्तव्यास होते. ते स्वतः येथून निवडणूकही लढले होते. त्यामुळे महामानवाचे नाव नायगाव बीडीडी चाळीला देण्याचा आग्रह मी धरला होता. पण, हे सर्व मुद्दे बाजूला ठेवून बाबासाहेबांऐवजी शरद पवारांचे नाव देण्यात आले. त्यामुळे स्थानिक आमदार या नात्याने मी त्याला विरोध केला. मोठी लढाई लढलो आणि नायगाववासीयांच्या आशीर्वादाने ती जिंकलो.
 
 
  • तुम्ही ही नामांतराची लढाईत जिंकलात, त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किती योगदान आहे?
 
- देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी विशेष मदत करतात. नायगाव बीडीडी चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्यामुळे जलदगतीने मार्गी लागला. पोलीस हाऊसिंगचा प्रश्न ते लवकरच मार्गी लावणार आहेत. मुंबईतील पोलिसांना न्याय मिळावा, त्यांना हक्काचे घर मिळावे, हे माझे स्वप्न आहे. देवेंद्र फडणवीस माझी स्वप्नपूर्ती करतील, असा विश्वास आहे.
 
 
  • ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करून भाजप बेरजेचे राजकारण करीत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तुम्ही त्यांना काय प्रत्युत्तर द्याल?
 
- तुम्ही कितीही चांगली कामे करा, विरोधक विरोधच करणार. कारण, त्यांचे ते कामच आहे. एखाद्या गोष्टीला विरोध केला नाही, तर ते राजकारणात टिकून राहू शकत नाहीत. त्यामुळे असल्या विरोधाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
 
 
 
  • यंदा नवव्यांदा विधानसभेला सामोरे जात आहात. अशावेळी तुमचा विश्वविक्रम होऊ न देण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या आव्हानाकडे कसे पाहाता?
 
- १९९० साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला पहिली संधी दिली. तेव्हापासून आजपर्यंत मी कधीच मागे वळून पाहिले नाही. माझ्या जीवनात अनेक प्रसंग आले, पण त्यातून मार्ग काढत पुढे गेलो. नायगाव-वडाळा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या मागे भक्कमपणे उभी आहे. विरोधकांचे आव्हान माझी जनता परतवून लावेल.
 
 
 
सुहास शेलार
 
 
 
Powered By Sangraha 9.0