मुंबई : ( Irshalwadi )ईर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना आचारसंहितेआधी घरांचा ताबा देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दिली. खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी या आदिवासी वस्तीवर दरड कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ जण बेपत्ता झाले होते.
या दुर्घटनेनंतर ईर्शाळवाडीचे कायमस्वरूपी पुर्नवर्सन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. अवघ्या सात दिवसात दरडग्रस्तांना तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर हाऊस उपलब्ध करून दिली होती. यावेळी आपदग्रस्तांना विक्रमी वेळेत पक्की घरे बांधून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. त्यानुसार सुरुवातीला ईर्शाळवाडीच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी २.६० हेक्टर जागा तातडीने हस्तातंरीत करण्यात आली. 'एमएसआरडीसी'ने पुनर्वसन आराखडा तयार करून त्याला मंजूरी दिली. प्रत्येकी तीन गुंठे जागेवर, प्री-कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून एकूण ४४ घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिडकोला हे काम देण्यात आले. आपदग्रस्त कुटूंबांना घरांसोबत शाळा, समाजमंदीर, खेळाचे मैदान या सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. अंतर्गत रस्ते, पाणी, आणि वीज आदि सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.
शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या घरांची पाहणी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ईर्शाळवाडीची दुर्घटना अतिशय दुर्देवी होती. अनेक कुटुंबे मृत्यूमुखी पडली. त्यानंतर येथील ग्रामस्थांचे तात्काळ पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्था सिडकोने चांगल्या प्रकारे केली. फक्त घरे नाही, तर गाई गुरांचा गोठा, अंगणवाडी, बालवाडी, समाज मंदिर, दवाखाना, मैदाने, उद्याने अशा सगळ्या सोई याठिकाणी दिलेल्या आहेत. मला समाधान आहे, दरडग्रस्त कुटुंबांसाठी सिडकोने अतिशय चांगल्या दर्जाची घरे बांधून दिली आहेत. अतिशय जलद गतीने हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व विस्थापित कुटुंबांना नवीन घरांचा ताबा दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिडकोमध्ये मिळणार नोकरी
ईर्शाळवाडीतील सुशिक्षित तरुण युवकांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मुख्यमंत्री व्यवसाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत सिडकोमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. महिलांनाही बचत गटाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.