नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केली आहे.
पाकची राजधानी इस्लामाबाद येथे एससीओ शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये एससीओ सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. भारतातर्फे या शिखर परिषदेत कोण सहभागी होणार, याविषयी उत्सुकता होती.
परराष्ट्र मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकारपरिषदेत त्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पाकमध्ये होणाऱ्या एससीओ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेचे निमंत्रण भारतास प्राप्त झाले आहे. इस्लामाबाद येथे १५ आणि १६ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर करणार आहेत, असे जयस्वाल यांनी सांगितले आहे.
यानिमित्ताने २०१५ सालानंतर म्हणजे तब्बल ९ वर्षांनंतर भारतीय मंत्री पाकला भेट देतील. यापूर्वी २०१५ साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेच्या निमित्ताने इस्लामाबाद येथे गेल्या होत्या.