मुंबई : (Mangal prabhat lodha)'आय.टी.आय' मुंबईला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी या संस्थेचे नामकरण करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचा गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर येथे शुभारंभ करण्यात आला.
एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, उत्तर प्रदेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार, राष्ट्रीय लोकदलाचे महासचिव के.पी.चौधरी, माजी लोकसभा सदस्य मलुक नागर, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदिप डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करणे ही केवळ सन्मानाची गोष्ट नाही, तर त्यांचा आदर्श घेऊन आम्ही हजारो तरुणांना स्वावलंबी बनवण्याचे काम करत आहोत. त्यासोबतच आज संत गाडगे बाबांच्या नावाने आम्ही स्वच्छ भारत प्रबोधिनीची सुरुवात केली आहे. त्याकाळी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी संत गाडगे बाबांनी हातात झाडू घेतला आणि स्वच्छता अभियान सुरू केले. ज्याप्रमाणे संत गाडगे बाबांनी त्याकाळी महाराष्ट्रातला कचरा बाहेर काढला, त्याचप्रमाणे आज मुंबईमध्ये घुसलेले रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर बाहेर काढायला हवेत.”