मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, निवडणूक कालावधीत निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल, तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशावेळी निवडणूक निकालांचे अंदाज दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.
त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ तासांच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.