दिल को देखो...

25 Oct 2024 23:05:48
 
Maha Vikas Aghadi
 
महाविकास आघाडीत सामील झालेल्या विश्वासघातकी नेत्यांनी सदैव आयुष्यभर प्रत्येकाची कामे बिघडविणार्‍या नेत्यांच्या नादी लागून लोकांचा विश्वास गमावला. शिवाय जो काही भ्रष्टाचार, अनाचार आणि अकार्यक्षम राज्य कारभार मविआने त्यांच्या अडीच वर्षांत चालविला, त्याला आता या गाण्यातील मतितार्थ चपखल लागू पडतो.
 
मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा ७०च्या दशकात ‘रोटी’ हा चित्रपट आला होता. त्यात गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेले गाणे होते, ‘ये पब्लिक हैं, सब जानती हैं...’ आणि याच काळात त्यांचा ‘सच्चा-झुठा’ हा चित्रपटही आला होता आणि त्यात गीतकार इंदिवर यांचे गाणे होते, ‘दिल को देखो, चेहरा न देखो...’आता या गाण्याचा संबंध तसा त्या-त्या चित्रपटातील कथानकानुसार असला तरी, त्या गाण्यातील अन्वयार्थ मात्र सद्य परिस्थितीला देखील लागू पडतो.
 
महाविकास आघाडीत सामील झालेल्या विश्वासघातकी नेत्यांनी सदैव आयुष्यभर प्रत्येकाची कामे बिघडविणार्‍या नेत्यांच्या नादी लागून लोकांचा विश्वास गमावला. शिवाय जो काही भ्रष्टाचार, अनाचार आणि अकार्यक्षम राज्य कारभार मविआने त्यांच्या अडीच वर्षांत चालविला, त्याला आता या गाण्यातील मतितार्थ चपखल लागू पडतो. कारण, ज्या व्यक्तीने अख्खी हयात राजकारणात घालविताना ना कधी स्वतःच्या पक्षाला मोठे केले, ना आपल्या पक्षातील नेत्यांना मोठे होऊ दिले, त्यामुळे राज्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ उडाला. राज्याच्या निर्मितीनंतर मनोहर जोशी, नारायण राणे आणि नंतर देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारांना तो निस्तरावा लागला. मविआच्या अडीच वर्षांच्या काळात तीन पक्षांनी या राज्याचे वाटोळ करण्याचा जो घाट घातला होता, त्याला फडणवीस-शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने मोठ्या प्रमाणात पायबंद घालण्यात यश आले. ठाकरे सरकारने स्थगिती आणलेल्या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाची चाके गर्तेत रुतली. सर्वच आघाड्यांवर विकसित महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे झाली ती मविआच्याच अडीच वर्षांमध्ये. त्यामुळे मविआच्या नेत्यांची मने कशी विघातक आहेत, हे या राज्यातील जनतेने अनुभवले आहेत. त्यांना माहीत आहे कोण ‘सच्चा’ आणि कोण ‘झुठा’, म्हणूनच इंदिवर यांनी लिहिलेले गाणे हे आघाडीतील लोकांच्या चेहर्‍यांना चपखल लागू पडते. कारण, हे चेहरे कसे ‘झुठे’ आहेत, हे लोकांना आता पटले आहे, यात संदेह नाही. त्यामुळे ‘दिल को देखो...’ हेच मान्य करायचे, हे आता जनतेने ठरविले आहे.
 
चेहरा ना देखो...
 
ता या ओळी कशा लागू पडतात बघा. ज्या ठाकरेंनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर घडवून आणले, आज त्यांच्याच पक्षाची शकले उडाल्याचे सगळ्या जनतेने बघितले. ज्यांनी कधी स्वबळावर राज्यात सत्ता आणली नाही, ते आता सत्तेसाठी अनैसर्गिक आघाड्या करुन स्वप्नरंजन करीत आहेत. बरे केवळ सत्ता उपभोगण्यासाठी हे सगळे करताना, त्यांनी अडीच वर्षांत जे कारनामे केले, त्याचा पाढा वाचला तर, या राज्यातील मतदारांचा आता ‘चेहरा ना देखो’ असेच एकमेकांना सांगतील, यात काही शंका असण्याचे कारण नाही.
 
आज राज्यातील प्रमुख शहरांत मेट्रो रेल्वे प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती देत आहे. शासनाचा महसूल वाढवित आहे. त्याच ‘मेट्रो ३’ प्रकल्पाला देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत ठाकरेंनी अहंकारापोटी आणि पर्यावरणाच्या नावाखाली विरोध केला. ढोंगी पर्यावरणप्रेमी राजपुत्राच्या नादात त्यांनी मुंबईकरांना खोळंबून ठेवले. त्यांच्या अहंकाराच्या व्यसनाने विकासाचे तीनतेरा वाजले. ‘गुन्हेगार मोकाट, पोलीस सज्जनांच्या मागे’ अशी तेव्हाची परिस्थिती. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. हनुमान चालीसा म्हणणार्‍यांना तुरूंगात डांबले होते आणि एवढेच नाही तर ‘पीएफआय’ समर्थकांना बक्षिसे दिली होती. अशा या मविआच्या नतद्रष्टांना ‘मुघल गार्डन’, ‘हज हाऊस’ तयार करायची महत्त्वाकांक्षा अधिक आहे, हे जनता थोडी विसरणार आहे. कोरोना काळात ऑक्सिजन घोटाळ्यातून यांच मविआच्या लोकांनी कोट्यवधींची कमाई केल्याचे जनतेच्या स्मरणात आहे. त्यामुळे यांचे चेहरे बघायलाच नको, असे जनतेने ठरविले असल्यास नवल ते काय...
 
खरं तर मतदारांनी मविआच्या अडीच वर्षांच्या काळ्या कालखंडाची उजळणी जरी केली, तरी विस्मरणात गेलेले या मंडळींचे प्रताप पुन्हा खाडकन डोळे उघडतील, याची शंका नाही. म्हणूनच बरेचदा जनतेच्या याच गोष्टी काही काळानंतर आपसुकच विसरण्याच्या सवयीचा गैरफायदा असे राजकारणी घेताना दिसतात पण, त्यानंतर त्याची मोठी किंमत जनतेलाच मोजावी लागते. त्यामुळे ‘ये पब्लिक हैं, सब जानती हैं’ हे लक्षात ठेवावे.
 
 अतुल तांदळीकर 
Powered By Sangraha 9.0