दहशतवादावर दुटप्पीपणास थारा नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांचे प्रतिपादन

    23-Oct-2024
Total Views |

MODI
 
नवी दिल्ली : ( PM Modi at BRICS Summit 2024 ) दहशतवाद ही जागतिक समस्या असून त्याचा सर्वांनाच धोका आहे. त्यामुळे दहशतवादाचा सामना करताना दुटप्पीपणास थारा नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत बुधवारी केले आहे.
 
रशियातील कझान येथे १६ व्या ब्रिक्स शिखर परिषद झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेच्या प्लेनरी सत्रास संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, दहशतवाद आणि दहशतवादी वित्तपुरवठा यांचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकमताने एकत्र येऊन सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे. अशा गंभीर विषयावर दुटप्पीपणाला थारा नाही. आपल्या देशातील तरुणांमध्ये कट्टरतावाद रोखण्यासाठी आपण सक्रीय पावले उचलली पाहिजेत. संयुक्त राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशनाच्या प्रलंबित मुद्द्यावर आम्हाला एकत्र काम करावे लागेल. त्याचप्रमाणे,सायबर सुरक्षा, सुरक्षित आणि विश्वसनीय कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक नियमनासाठी काम केले पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.
 
भारत संवादाचे समर्थन करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, कोणताही संघर्ष असो अथवा युद्ध; त्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. सध्या जग युद्ध, संघर्ष, आर्थिक अनिश्चितता, हवामान बदल, दहशतवाद इत्यादी अनेक आव्हानांनी वेढलेले आहे.जगात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अशी फूट पडल्याची चर्चा आहे. महागाई रोखणे, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, जल सुरक्षा हे सर्व देशांचे प्राधान्याचे मुद्दे आहेत. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या युगात, सायबर सुरक्षा, डीप फेक, चुकीची माहिती यांसारखी नवीन आव्हाने बनली आहेत.अशा स्थितीत ब्रिक्सकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे एक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून ब्रिक्स सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका बजावू शकते असा आपला विश्वास आहे. ब्रिक्स हा फुटीरतावादी नसून सार्वजनिक हिताचा समूह असल्याचा संदेश आपण जगाला द्यायला हवा, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
 
जागतिक संस्थांमधील बदलांसाठी एक व्हावे
 
ब्रिक्समध्ये काळाबरोबर स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छाशक्ती आहे. हा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवत, जागतिक संस्थांमधील सुधारणांसाठी एकमताने आवाज उठवण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, बहुपक्षीय विकास बँका, डब्ल्यूटीओ यांसारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी आपण कालबद्ध रीतीने पुढे जायला हवे. त्यामुळे जागतिक संस्थांमध्ये केवळ सुधारण नव्हे तर बदलही घडविण्याचे ध्येय असावे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटले आहे.