मुंबई : ( Manoj Jarange On Assembly Elections 2024 ) राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्गा सतत चर्चेत राहिला आहे. यासंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजवर अनेक उपोषणे व आंदोलने केली आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने यावर कोणताही ठाम निर्णय वा भूमिका घेतलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच मनोज जरांगे यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावून विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
जरांगेंनी केल्या 'या' ३ घोषणा
या बैठकीमध्ये जरांगेंनी मराठा समाजाचे जनमत विचारात घेत उमेदवार उभे करणार की पाडणार याबाबत खुलासा केला आहे. याबाबत बोलताना जरांगेंनी ३ महत्त्वाच्या घोषणा केल्या-
- ज्या मतदारसंघात मराठा उमेदवार विजयी होण्याची खात्री असेल त्या जागेवर निवडणूक लढवणार.
- मराठा समाजाच्या मतांशी सहमत असणा-या SC/ST साठी राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या SC/ST उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ.
- ज्या मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार नसेल, त्या ठिकाणी आपण उमेदवार उभा करणार नाही. मात्र त्या जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडून त्याचा मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा असेल असं ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार.
पुढे काय म्हणाले जरांगे ?
“आपला उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो? तसेच कोणत्या मतदारसंघात मुस्लिम-दलित एकत्र आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. मात्र, तुम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणत्या मतदारसंघामधून कोणाचा अर्ज ठेवायचा? आणि कोणाचा अर्ज मागे घ्यायचा? हे सांगेल. पण तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरा. मी बरोबर समीकरणं जुळवतो”, असं म्हणत मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी सरकारने मान्य न केल्यास आपण विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करु असा इशारा जरांगेंनी दिला होता. तसेच सत्ताधाऱ्यांचे आमदार निवडणुकीत पाडणार असल्याचाही इशाराही त्यांनी दिला होता.