मुंबई : ( Pravin Darekar ) उबाठाला आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना सगळे केंद्रीय नेते मातोश्री दरबारी येत होते. परंतु अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे दिल्लीच्या चरणी लोटांगण घालत होते. नाना पटोलेंच्या वादाच्या निमित्ताने चेन्नीथला यांना मातोश्रीवर यावे लागले यात उद्धव ठाकरे खुश राहणार आहेत. परंतु संजय राऊत यांनी लगेच पलटी मारली आहे. गिर गया तो भी टांग उपर, अशी त्यांची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेल्या विधानावर दरेकर यांनी म्हटले की, स्वास्थ्य चांगले आहे की ठीक आहे हे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या एकमेकांवर ज्या कुरघोड्या चाललेल्या आहेत त्यातून दिसून येतंय. आमची महायुतीची झालेली पत्रकार परिषद खेळीमेळीच्या वातावरणातील लोकांनी पाहिलीय. नाना पटोले पत्रकार परिषदेतून उठून जाताना विजय वडेट्टीवार हाताने धरताना पाहिलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे स्वास्थ्य काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला नीट दिसून आले आहे.
तसेच विदर्भात नाना पटोले आणि काँग्रेस उबाठा गटाला मोजायलाच तयार नाही. नगण्य अशा प्रकारची दोन तीन जागा देण्याची तयारी असू शकते. परंतु उद्धव ठाकरे गटाचे तेथील संपर्क प्रमुख भास्कर जाधव जास्तीच्या जागांवर अडून आहेत. मात्र नाना पटोले आणि काँग्रेस उबाठा गटाला हिंग लावून पुसायला तयार नाहीत. जरी तेथे जागा वाटप झाले तरी निवडणुकीत काय होईल हे विदर्भात निकालात दिसून येईल, असेही दरेकर म्हणाले.
संजय राऊत यांच्या विधानावर दरेकर म्हणाले की, वाटा हा मागून मिळत नसतो, वाटा हा आपल्या अस्तित्वावर, आपली असणारी ताकद, असणारा जनाधार यावर मिळत असतो. परंतु अलीकडच्या काळात संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने लाचारीची भूमिका घेतली आहे. बाळासाहेब हयात असताना जी शिवसेना होती त्यावेळी भाजपने बाळासाहेबांच्या शिवसेनेला सातत्याने झुकते माप दिलेले आहे. अगदी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या रूपाने पाहिलेले आहे. त्यासाठी अस्तित्व, भूमिका लागते. हिंदुत्व, मराठी माणसाच्या हिताची भूमिका सोडून काँग्रेसच्या चरणी 'घालिंग लोटांगण' करत असाल तर महत्त्वाचा वाटा, जागा कशा मिळणार? महाराष्ट्राची ओळख ही स्वाभिमानी म्हणून आहे. परंतु उबाठा गटाने काँग्रेसच्या चरणी लोटांगण घालून लाचार अशी प्रतिमा बनवून ठेवली असल्याची टिकाही दरेकरांनी केली.
संजय राऊतांनी दुसऱ्याच्या पँटची काळजी करू नये
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, आपल्या पँटला काही डाग लागणार नाही याची काळजी संजय राऊत यांनी घ्यावी. दुसऱ्याच्या पँटची आणि चिखलाची काळजी करत असताना आपली त्रेधातिरपीट उडू नये याची काळजी घ्या. संजय राऊत यांनी स्वतःच्या अंगाला चिखल लागणार नाही याची काळजी घ्यावी, असा टोलाही दरेकरांनी लगावला.