मुंबई : ( Shivsena UBT )'उबाठा' गटाने शिवडी आणि चेंबूरच्या विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्याच्या हालचाली सुरू केल्याने, बंडाळीचे संकेत मिळत आहेत. अजय चौधरी आणि प्रकाश फातर्फेकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे कळते.
मातोश्री निवासस्थानी गुरुवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी 'उबाठा' गटाच्या विद्यमान आमदारांची बैठक पार पडली. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तुम्हा सगळ्यांची उमेदवारी पक्की, असा शब्द यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला. परंतु, या बैठकीला अजय चौधरी आणि प्रकाश फातर्फेकर यांना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे दोघेही अस्वस्थ असल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली. शिवसेनेतील फुटीनंतर शिवडी आणि चेंबूरमध्ये विद्यमान आमदार निवडून येण्याजोगी स्थिती नसल्याचे हेरत उमेदवार बदलण्याबाबत ठरल्याचे कळते.
शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी हे सलग दोनवेळा निवडून आले. शिवसेना फुटीनंतर त्यांची 'उबाठा'च्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र, हे पद भूषवणाऱ्या व्यक्तीचा विधिमंडळात जसा आवाज घुमावा लागतो, तसा चौधरींचा कधी घुमला नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीत शिवडीमध्ये उबाठाचे मताधिक्य प्रचंड घटले. त्यामुळे चौधरी यांच्याऐवजी सुधीर साळवी यांना संधी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. साळवी हे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आहेत. शिवाय ते अंबानी कुटुंबीयांच्या जवळचे मानले जातात.
चेंबूरमधून कोण?
प्रकाश फातर्फेकर हे चेंबूरचे विद्यमान आमदार असले, तरी काँग्रेसमधून त्यांना विरोध होत आहे. शिवाय त्यांच्याविरोधात मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचाही फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांच्याऐवजी माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांना संधी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे कळते. मात्र, पक्षफुटीनंतर ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यानंतरही तिकिट कापले जात असले, तर या दोन्ही मतदारसंघात बंडाळी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.