मविआत ठिणगी : नाना पटोलेंसोबत उबाठा गटाची एकही बैठक होणार नाही!

18 Oct 2024 15:54:40

MVA
 
मुंबई : ( MVA ) ज्या बैठकीत नाना पटोले असतील त्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एकही नेता उपस्थित रहाणार नाही, अशी स्पष्ट आणि उघड भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. जागावाटपात सुरू असलेल्या वादामुळे ही ठिणगी पडली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नाना पटोलेंमुळे काँग्रेस आणि उबाठा गटात वारंवार ठिणग्या पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. मात्र, ही उघड भूमिका ऐन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पुढे जाणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
 
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील वाय.बी.चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदही घेण्यात आली मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थित रहाण्याऐवजी खासदार अनिल देसाई हे उबाठाकडून उपस्थित होते. या बैठकीनंतरच काही काळानंतरच उद्धव ठाकरेंची ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या संदर्भात नाना पटोले यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून समज देण्यात येऊ शकते.
 
तसेच उद्धव ठाकरेंची साथ या वेळी सोडणे हे महाविकास आघाडीला न परवडण्यासारखी आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दिल्लीतून किंवा महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यातर्फे उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान यात शरद पवारांची भूमिका काय ही अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे लोकसभेच्या जागावाटपासंदर्भातही अशाच प्रकारचे खटके नाना पटोले आणि उबाठातील वरिष्ठ नेत्यांशी उडाले असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.
 
नानांशी वाद काय?
 
नाना पटोलेंसोबतच्या वादाला काँग्रेसच्याच काही नेत्यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचीही माहिती आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसमधील एका नाना विरोधी गटाची बाजू घेऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत बाजू मांडणार असल्याचीही माहिती आहे. यापूर्वीही लोकसभेत नाना पटोले आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचे खटके उडाल्याचे पहायला मिळाले होते. याच वादाचा हा दुसरा अंक असल्याची चर्चा सध्या व्यक्त केली जात आहे.
 
राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत - संजय राऊत
 
काँग्रेसला जागावाटपासाठी वेळ लागत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. काँग्रेसला सगळचं दिल्लीत विचारुन करावं लागत असल्याचा आरोप राऊतांनी केला. याबद्दल नाना पटोलेंना प्रश्न विचारला असतानाच नाना पटोले पत्रकार परिषदेतून उठून जात होते. त्यांना वडेट्टीवारांनी थांबविल्यानंतर त्यांनी प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. नाना पटोलेंनी याबद्दल बोलताना सांगितलं की, "त्यांचे नेते हे महाराष्ट्रातच आहेत. आमचे वरिष्ठ नेते दिल्लीत असल्याने वेळ लागत आहे," असं उत्तर त्यांनी दिलं.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0