"रिपोर्ट कार्ड देण्याकरिता धाडस लागतं, त्यासाठी..."; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

16 Oct 2024 13:26:09
 
Mahayuti
 
मुंबई : रिपोर्ट कार्ड देण्याकरिता धाडस लागतं. त्यासाठी काम करावं लागतं, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. बुधवारी महायूती सरकारने संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन वर्षांतील कामांचं रिपोर्टकार्ड सादर केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "रिपोर्ट कार्ड देणारं हे आमचं पहिलं सरकार आहे. रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी धाडस लागते. त्यासाठी कामं करावी लागतात. अन्यथा रिपोर्ट कार्डमध्ये देणार काय? आम्ही हा प्रकल्प बंद पाडला, ही योजना बंद पाडली हे देणार का? त्यामुळे मला आमच्या सरकारचा अभिमान आहे."
 
हे वाचलंत का? - लाडकी बहिण संदर्भात अजितदादांनी दिली महत्वाची अपडेट!
 
"आमचं सरकार आल्यावर आम्ही सगळ्या योजना बंद करणार, जेलमध्ये टाकणार, पोलखोल करणार, असं विरोधक म्हणतात. पण कोणाला जेलमध्ये टाकणार? तुमची तर कोविडमध्ये पोलखोल झालीच आहे. काही लोकं जेलमध्येसुद्धा गेलेत. त्यामुळे योजना बंद करणाऱ्या लोकांना जनता साथ देणार नाही. योजना बंद करण्याबाबत विरोधक आता खुलेआम बोलायला लागलेत. पण लाडकी बहिण योजनेला कुणी टच केलं तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार. कारण आमच्या लाडक्या बहिणी अजिबात ऐकून घेणार नाहीत," असे ते म्हणाले.
 
दुध का दुध पानी का पानी होऊ द्या!
 
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, "माझं काय यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं काय हे बघा. माझं काय बघून उद्योजक पळून गेलेत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्ही जे निर्णय घेतले ते शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, युवक-युवती, जेष्ठ मंडळी या सर्वांसाठी घेतले आहेत. महायूती सरकारमध्ये केलेलं कामांची आकडेवारी आम्ही या रिपोर्ट कार्डमध्ये दिली आहे. महाविकास आघाडी आणि महायूती सरकारमध्ये झालेल्या कामाची तुलना करा आणि दुध का दुध पानी का पानी होऊ द्या. आम्ही कमी कालावधीत जास्तीचं काम केलं आहे."
 
"आपल्या राज्याबद्दल आपल्याला अभिमान वाटायला हवा. पण विरोधक राज्याची बदनामी करत आहेत. महाविकास आघाडीच्या काही लोकांनी खड्ड्यात घालण्याची सुपारी घेतली आहे. मला, देवेंद्रजींना आणि अजितदादांना दिवसातून हजारों लोकं भेटतात. पण पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. वर्षा बंगल्याचे दरवाजे किती लोकांसाठी उघडे होते याचा विचार करा. कुणीही आला की, आम्ही लगेच सही करतो. पण तुम्ही तर पेनसुद्धा काढत नव्हते. आमचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत जनता आमच्या कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0