दत्तक पालकत्व योजनेमुळे ठाणे जिल्ह्यात कुपोषणात घट; सद्यस्थितीत १२४४ कुपोषित बालके

07 Jan 2024 18:38:25
Thane District Adoptive Parent Scheme

ठाणे (दीपक शेलार) :
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी "दत्तक- पालकत्व अभियान" ठाणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील तीव्र कुपोषित (सॅम) बालकांची संख्या ८३ तर मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या ११६१ अशी एकुण संख्या १२४४ इतकी आहे. जी पुढील सहा महिन्यात शून्यावर आणण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. दरम्यान, २०२१ मध्ये मविआ सरकारच्या काळात एकुण १७८९ कुपोषित बालकांपैकी ९९ बालकांचा मृत्यु ओढवला होता.

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात बालमृत्यु, माता मृत्यु तसेच कुपोषण आदींवर उपाय म्हणुन राज्य सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या नियोजनात जिल्हा तसेच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना प्रत्येकी एक बालक दत्तक देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी शुक्रवारी (दि. २२ डिसेंबर) रोजी शहापुर डोळखांब येथील कुपोषित बालकाच्या घरी भेट देऊन आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या.

तसेच,सर्व अधिकाऱ्यांना कुपोषित दत्तक पालकत्व अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या बालकांचे पंधरा दिवसांनी संपर्कात राहून गृहभेटी देऊन आरोग्य विषयक माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर पालकांसोबत आरोग्य विषयक समुपदेशन करण्यासह, स्वच्छतेचे महत्त्व, पोषक आहार कुपोषित बालकाला दररोज मिळावे अशी काळजी घेण्यात यावी. असेही त्यांनी सांगितले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, अर्थ विभाग प्रमुख वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे उपस्थित होते.

कुपोषण मुक्तीकडे वाटचाल
 
गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर, परिचारिका, सुपरवायझर आदी सर्वांना कुपोषित बालकांची आरोग्य विषयक माहिती दररोज घेण्यासाठी गृहभेट देण्यात येत आहे. त्यामुळे कुपोषित बालकांची नेमकी स्थिती कळणार असल्याने अन्य उपाय योजनाही करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.

Powered By Sangraha 9.0