पर्यटन मंत्री पदावर आदित्य ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गुंडाळला!

05 Jan 2024 19:07:35
 Uddhav Thackeray
मुंबई : महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये होऊ घातलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याचा आरोप, उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. यासाठी त्यांनी महायुतीच्या सरकारला जबाबदार धरले होते. यानंतर महायुती सरकारने स्पष्ट केल होते की, सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही. गुजरातचा पाणबुडी प्रकल्प हा वेगळा आहे.
 
त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग पाणबुडी प्रकल्पाच्या संदर्भात नवीन खुलासा केला आहे. नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये सिंधुदुर्ग प्रकल्प हा आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असतानाच गुंडाळला गेल्याचे आरोप केले आहेत. यासाठी त्यांनी त्यावेळीच्या बातमी पत्रातील बातम्यांचे कटिंग सुद्धा आपल्या ट्विटसोबत शेयर केले आहेत.
 
नारायण राणे यांनी केलेल्या दाव्यानुसार, २०१८ मध्ये राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने वेंगुर्ल्यासाठी पाणबुडी प्रकल्पाला सुरुवात केली. २०१९ च्या सुरुवातीला त्यासाठी निविदाही निघाली. पण प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्याही निविदेला प्रतिसाद नाही. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. ३० नोव्हेंबर २०१९ ते २६ जून २०२२ पर्यंत राज्याचे पर्यटन मंत्री होते आदित्य ठाकरे. त्यांच्या कारकिर्दीच्या कालावधीत पर्यटन विभागामध्ये पाणबुडी प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय झाला.
 
नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचे आणि त्यांच्या गटाचे कोकणावरचे प्रेम बेगडी असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि मंडळींचे कोकणावरचे प्रेम कसे बेगडी आहे ते दाखविणारा हा आरसा. कदाचित बॉलिवूड पर्यटनात गुंतून पडल्यामुळे सिंधुदुर्गासाठी वेळ देता आला नसावा."
 
Powered By Sangraha 9.0