मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्री लोढा यांनी केली मागणी

24 Jan 2024 20:14:57
mangalprabhat loadha

मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी गिरगाव येथील गोल देऊळ, कुंभारवाडा येथे बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी या बाईक रॅलीतील रामभक्तांना काही कट्टरपंथीयांनी थांबवून धमकावले. या घटनेनंतर रामभक्तांचा आक्रोश लक्षात घेत, या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
 
२२ जानेवारी रोजी काही कट्टरपांथीयांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी सकल हिंदू समाजाची मागणी होती. सीसीटिव्ही फुटेजमधून सर्व स्पष्ट होत असताना, तरी देखील काही दोषी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असून, सर्वांवर वेळेत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मंत्री लोढा यांनी यावेळी केली आहे.
 
महाराष्ट्रातील हे सरकार राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही आणि कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी कुंभार वाडा परिसरातील सकल हिंदू समाजाची होती, ही मागणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, व सहाय्यक आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम यावेळी करण्यात आले.
  
कट्टरपांथीयांकडून धमकावण्याची मागील २ ते ३ महिन्यातील ही ३ री घटना असून, वारंवार घडणाऱ्या या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांनी याविषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मंत्री लोढा यांनी यावेळी केली आहे. बाईक रॅली अडवणारे दोषी असून, अतिरिक्त कलमांसह त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, तसेच त्या परिसरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांवरील अहवाल मागवून त्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0