मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. २६ तारखेपासून मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उच्च न्यायालयाने जरांगेंना आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशा मागणीची याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने जरांगेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय आंदोलनाच्या वेळी रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हजारो बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास ट्रॅफिकचे काय होईल? असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी युक्तिवाद करताना केला. दरम्यान, आम्हाला आंदोलनाच्या परवानगीसाठी कोणतेही पत्र आले नाही, असे महाअधिवक्त्यांनी यावेळी सांगितले.
न्यायालयाने मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. आझाद मैदानात ५ हजार पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने यावेळी सांगितले. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.