नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारीला प्रभु श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे.
अयोध्येतुन परतल्यानंतर नरेंद्र मोदींनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं की ''आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील जनतेच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार १ कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे."
घरांच्या छतावर सौर पॅनल बसवुन सुर्यप्रकाशाच्या सहाय्याने विजनिर्मीती केली जाते. ज्यामुळे विजबील कमी होण्यास मदत होईल आणि उर्जेच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यातही मदत होणार आहे. अनेक अशी घरे जी आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती करतात त्यांच्याकडुन सरकार ती वीज विकतही घेते. त्यामुळे या पद्धतीनेही त्या घरांना फायदा होणार आहे.
एका अहवालानुसार, देशातील २५ कोटी घरांवर असे रूफटॉप सोलर लावले जाऊ शकते. या वर, ते ६३७ गीगावॅट पर्यंत ऊर्जा निर्माण करू शकतात. सध्या देशात केवळ ११ गीगावॅट रूफटॉप सोलर बसवण्यात आले आहेत. याच अहवालानुसार देशात सध्या सुमारे ७५ गीगावॅट सौरऊर्जा क्षमता आहे. २०१४ मध्ये ते फक्त २ गीगावॅट होते. अशा स्थितीत २०१४ पासून आतापर्यंत त्यात सुमारे ३५ पट वाढ झाली आहे.