मृतदेह कापसात बांधले! रॉकेल टाकून जाळले! कारसेवकांच्या बलिदानाने साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर

18 Jan 2024 12:25:13
 Sadhvi Ritambhara
 
मुंबई : अयोध्येत दि. २२ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह आहे. या दिवसासाठी कित्येक शतके रामभक्तांनी वाट पाहिली आहे. यामध्ये कारसेवकांचे पण तितकेच मोलाचे योगदान आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी कित्येक कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज अयोध्येत जे भव्य राम मंदिर उभा राहत आहे, ते लाखो कारसेवकांच्या त्यागामुळेच शक्य झाले आहे.
 
अयोध्येत १९९० मध्ये मुलायम सिंह यांच्या सरकारच्या काळात कारसेवेसाठी गेलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात कारसेवकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावेळी मुलायम सिंह यांच्या सरकारच्या आदेशावरुन पोलिसांनी गोळीबार करुन कित्येक कारसेवकांची हत्या केली होती. फक्त गोळीबारच नाही, तर त्यांच्यासोबत बर्बरता करण्यात आली होती. त्याचे अनेक पुरावे प्रत्यक्षदर्शींनी दिले.
 
 
मुलायम सिंह सरकारच्या काळात कारसेवकांवर झालेल्या बर्बरतेची माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अयोध्येतील कारसेवकांना गोळ्या झाडून सरयू नदीत बुडवल्याचे दाखवले जात आहे. नंतर काही कारसेवकांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह नदीतून काढण्यात आले होते. त्यांची ओळखही पटवता आली नाही. इतक्या छिन्न-विच्छिन्न अवस्थेत त्यांचे मृतदेह होते.
 
कारसेवेदरम्यान, कारसेवकांवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवेळी राम मंदिर आंदोलनाचा चेहरा राहिलेल्या साध्वी ऋतंभरा तिथेच होत्या. या घटनेविषयी त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या की, "छातीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. वाळूच्या पिशव्या बांधून कारसेवकांचे मृतदेह सरयू नदीत टाकण्यात आले होते. माझ्या गुरु भावाला कापसात गुंडाळून रॉकेल टाकून जाळण्यात आली. नि:शस्त्र लोकांसोबत असे घडायला नको होते." या घटनेची आठवण करताना त्या भावूक झाल्या.
 
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराविषयी आपल्या भावना सांगताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, "हे मंदिर काही सामान्य मंदिर नाही. ५०० वर्षे अखंडपणे हिंदूंनी एकाच ठिकाणी मस्तक टेकवले, प्रदक्षिणा केली आणि मंदिरासाठी संकल्प केले. भारतीयांच्या नष्ट झालेल्या स्वाभिमानाची ही पुनर्स्थापना आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0