"उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयातही पराभूत!"

17 Jan 2024 14:37:50

Uddhav Thackeray


मुंबई :
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात मंगळवारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वकील असिम सरोदे यांनीदेखील नार्वेकरांच्या निकालावर भाष्य केले होते. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही जे करत आहात तेच मुळात लोकशाही, संविधानविरोधी आहे. जनतेच्याही न्यायालयात तुम्ही आज पराभूत झाला आहात असे ते म्हणाले आहेत.
 
नितेश राणे म्हणाले की, "भारतीय संविधानाच्या दहाव्या शेड्युलवर अ‍ॅड. असिम सरोदेंची व्याख्यानमाला आहे, असे निमंत्रण दिले असते, तर फार कुणी गेले नसते. पण, त्याला महापत्रपरिषद नाव देऊन आमच्या बिचार्‍या पत्रकार मित्रांचा छळ करण्यात आला. एकनाथ शिंदेंसोबत ५६ पैकी ४२ आमदार असूनही ते दोन तृतियांश नाहीत, हा शोध असिम सरोदेंनी लावला आहे," असा टोला राणेंनी लगावला.
 
तसेच माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे किंवा माजी उपाध्यक्ष विजयकुमार औटी यांचे राजीनामा पत्र तत्कालिन शिवसेनेकडे आहे का? असा सवालही त्यांनी केला. कितीही व्हिडियो दाखविले किंवा आरडाओरड केली, तरी न्यायालय किंवा न्यायाधीकरण हे कायद्यानुसार चालत असते. त्यामुळे केलेले संपूर्ण बदल किंवा निवडणूक प्रक्रियेची माहिती रीतसर निवडणूक आयोगाला कळवावी लागते, एवढे साधे जर अ‍ॅड. परबांना कळत नसेल तर तो निव्वळ कपाळकरंटेपणा आहे, असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "२०१३ चा कागद दाखवताना तसाच कागद २०१८ चा दाखवाल का? पत्रव्यवहारांचे कितीही कागद दाखवले तरी त्यामुळे २०१८ मध्ये नव्या निवडीची नोंद आयोगाकडे न केल्याची चूक लपविण्याचा अत्यंत लबाड प्रयत्न अ‍ॅड. परब यांनी केला. त्यापेक्षा ती चूक कबुल केली असती, तर महाराष्ट्राच्या जनतेला खरेपणा समजला असता," असेही ते म्हणाले.
 
"विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रीतसर निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि त्यांनी १९९९ च्या माहितीनुसार, जे रेकॉर्डवर आहे, ते कळविले. २०१८ ची माहिती रीतसर आणि आयोगाच्या फॉर्मेटमध्ये पाठविली असती, तर मातोश्रीवरील बैठकीत सुभाष आणि अनिल देसाईंना इतकी झापझूप झालीच नसती. न्यायालयात प्रकरण सुरु असताना एकतर्फी पुराव्यांचा बाजार मांडणे, हा न्यायालयाचा अवमान आहे. हिंमत असेल तर एक महापत्रपरिषद दोन्ही गटांचे वकील बोलावून होऊन जाऊ द्या. तेव्हा ते लोकशाहीला आणि संविधानाला धरुन असेल. तुम्ही जे करत आहात तेच मुळात लोकशाही, संविधानविरोधी आहे. जनतेच्याही न्यायालयात तुम्ही आज पराभूत झालात," असेही नितेश राणे म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0