तब्बल पाच शतकांच्या संघर्षाला सोमवार, दि. 22 जानेवारी रोजी मूर्त स्वरूप येत आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पाश्वर्र्भूमीवर संपूर्ण देश राममय झाला आहे. मात्र, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अनेक रामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. येणार्या पिढीला राम मंदिरासाठीचा संघर्ष, रामजन्मभूमी आंदोलन नेमके काय होते, त्यात कुणाकुणाचा सहभाग होता. तसेच, राममंदिर निर्माणाचा इतिहास माहीत व्हावा, याकरिता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे यासंदर्भातील सर्व माहितीचे दस्ताऐवजीकरण केले जात आहे. हे काम नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि ‘आरूषा क्रिएशन्स’चे संचालक एकनाथ सातपूरकर यांच्यावर सोपविण्यात आले आहे. त्यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे उपसंपादक पवन बोरस्ते यांनी साधलेला हा विशेष संवाद.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे केल्या जाणार्या दस्ताऐवजीकरणासाठी आपली निवड कधी आणि कशी झाली, निवड झाल्याचे समजताच मनात काय भावना होती?
साधारण अडीच वर्षांपूर्वी मला भैय्याजी जोशी यांचा फोन आला. राममंदिराचे बांधकाम सुरू आहे आणि त्यासंदर्भात सर्व बाबींचे दस्ताऐवजीकरण करायचे असून ते कसे आणि कोणत्या पद्धतीने करावे, याविषयी एक अहवाल देण्यास त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी माझ्या टीमसोबत बसून एक सविस्तर अहवाल तयार करून भैय्याजींना पाठवला. त्यावर भैय्याजी जोशी, चंपतराय अशा अनेक मान्यवरांसोबत वर्षभर बैठका पार पडल्या. जानेवारी 2023 मध्ये शेवटची बैठक झाली, त्यात मला काम सुरू करण्यास सांगितले. संपूर्ण देशभरात अशा पद्धतीचे काम करणारे असंख्य लोक असताना माझी निवड या कामासाठी होणं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. सगळा अहवाल तयार केल्यानंतर मी प्रथमतः काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. गुरू प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनाही कळविले आणि ‘आरूषी क्रिएशन्स’च्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली.
ही दस्ताऐवजीकरण प्रक्रिया म्हणजे नेमके काय? ही प्रक्रिया कशी होते?
रामजन्मभूमी आंदोलन व राम मंदिराशी निगडित सर्व बाबींचे दस्ताऐवजीकरण फोटो, व्हिडिओ या माध्यमातून केले जात आहे. त्यात रामजन्मभूमीचा इतिहास, त्यासाठी झालेले आंदोलन. म्हणजे, अगदी कुलूप उघडण्यापासूनच्या घटना कशा घडल्या. त्याचे साक्षीदार, 1990, 1992ची कारसेवा, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या सर्व केसेस आणि निकाल अशा अनेक टप्प्यांचा समावेश यात आहे. आंदोलनात्मक भाग, कायदेविषयक, पुरातत्त्व, अयोध्येतील सर्व मठ-मंदिरांचा इतिहास आणि परंपरा या सगळ्यांचे दस्ताऐवजीकरण आपण करणार आहोत. राममंदिर विषयासंदर्भातील अनेक लोक आज हयात नाही. त्यामुळे या गोष्टींचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी विविध बाबी संकलित करून ठेवत आहोत. यासाठी मी गेल्या वर्षभरापासून अयोध्येतच आहे आणि जोपर्यंत रामरायाची इच्छा असेल तोपर्यंत मी अयोध्येतच असेन.
दस्ताऐवजीकरणात कोणत्या बाबींचा समावेश आहे, त्यासाठीचे संदर्भ मिळविण्यासाठी काय प्रयत्न करत आहात?
राम मंदिर विषयाशी जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या लोकांशी आपण संपर्क साधत आहोत. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती संकलित केली जात आहे. कारसेवा, कायदेविषयक, पुरातत्त्व बाजू याची नोंद व रेकॉर्डिंग केली जाते. सगळे संदर्भ मिळवून त्याचीही नोंद होते. आंदोलनावेळी उपस्थित पत्रकार, तसेच कारसेवकांच्या भेटीतून मिळालेली माहिती आणि त्यातून मिळालेले संदर्भ तपासूनमाहिती संकलित होतेय. राम मंदिरासाठी न्यायालयीन लढा देणारे वकील, निवृत्त न्यायाधीश यांच्या मुलाखती आपण घेतल्या आहे. अयोध्येतील मठ-मंदिरांचा रामजन्मभूमीशी संबंध, त्यांचा आंदोलनातील संबंध याची माहितीही घेतली आहे. आतापर्यंत अशा 140 मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघाकडे असलेली माहिती मग ती फोटोस्वरूपात असो वा व्हिडिओ स्वरूपात. ती माहितीदेखील पुढील काळात संकलित केली जाईल. कारसेवेदरम्यान गोळीबारात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती घेतल्या. जखमी झालेलेकारसवेक, देशाच्या कानाकोपर्यांतून आलेले कारसेवक, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, अनेक स्वयंसेवक, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती आपण घेतल्या. जवळपास सर्व राज्यांचा प्रवास करून ही माहिती एकत्रित केली जातेय. माझ्याबरोबर 35 जणांची टीम कार्यरत असून त्याचे नेतृत्व माझ्या हाती आहे. मंदिर निर्माणापासून ते पूर्ण होईपर्यंतचे फोटो, व्हिडिओदेखील आम्ही काढले आहेत. अगदी क्रेनवर चढूनही फोटो काढलेत. सध्या जे सोशल मीडियावर आपणाला फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात, ते सर्व आमच्या टीमने काढले आहेत. हे सगळे फोटो आम्ही प्रथम ट्रस्टकडे देतो, त्यानंतर ट्रस्ट त्यावर निर्णय घेते. परस्पर आम्ही कोणतीही माहिती वा दस्ताऐवज कुणालाही देत नाही.
दस्ताऐवजीकरणाचे काम कधीपर्यंत सुरू राहणार, त्याचा सामान्य रामभक्तांना कशाप्रकारे लाभ घेता येईल व हा ठेवा कसा जतन केला जाईल?
साधारणतः 2025 पर्यंत दस्ताऐवजीकरणाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. सध्या ही माहिती फक्त संकलित केली जात असून ती रामभक्तांना कशापद्धतीने जाणून घेता येईल, हे ट्रस्ट ठरविणार आहे. येणार्या पिढीला रामजन्मभूमी आंदोलन नेमके काय होते, तेव्हा काय घडले होते, त्यात कुणाकुणाचा सहभाग होता, याची माहिती मिळावी, यासाठी हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे गरजेचे आहे. याविषयीचे दस्ताऐवजीकरण सध्या फार अत्यल्प आहे. त्यामुळेच रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ही माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला. या माहितीचे नेमके काय केले जाईल, याचा निर्णय ट्रस्ट घेणार आहे. भविष्यात ही माहिती देशभरातील रामभक्तांना उपलब्ध होईल, हे मात्र नक्की. मात्र, ती कोणत्या स्वरूपात उपलब्ध होईल, हे तूर्त सांगता येणार नाही.
आपल्या कारसेवेच्या आठवणी आणि रामरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला दस्ताऐवजीकरणाच्या माध्यमातून रामरायाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याविषयी काय सांगाल?
मी आणि माझी पत्नी स्वप्ना सातपूरकर असे आम्ही दोघेही1990 आणि 1992 च्या कारसेवेला गेलो होतो. पहिल्या कारसेवेला आम्ही प्रयागराजला रेल्वेने पोहोचलो. त्यानंतर पुढील तीन दिवस जंगल, नद्या ओलांडून पायी चालत अयोध्येत पोहोचलो होतो. त्यावेळी रस्त्यांवर रक्ताचे ओघळ, कपडे-चपलांचा खच असे विदारक दृश्य होते. 1992च्या कारसेवेलाही आम्ही गेलो होतो. शरयुकिनारी आमची राहण्याची व्यवस्था होती. कारसेवेच्या दिवशी जन्मभूमीवर आलो. तिथे भाषणं सुरू होती. अचानक ढाचा उद्ध्वस्त झाल्याचा आवाज आला. त्यादिवशीचं अयोध्येचं दृश्य अविस्मरणीय होतं. वातावरण अगदी आनंदमय झालं होतं. पूर्वजन्माचं संचित, पुण्याई असेल म्हणूनच मला हे काम करण्याची संधी मिळाली. या कामासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने माझ्यासारख्या संघ स्वयंसेवकावर जो विश्वास दाखवला, काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कृतकृत्य आहे. नाशिकचे छायाचित्रकार हेरंब कुलकर्णी हेदेखील माझ्यासोबत आहेत. मला ट्रस्टने मानधन घेण्याविषयीही विचारले मात्र, मी नकार दिला. रामरायाने सर्व काही दिलं. मानधन घेऊन मी काय करू? हे सगळं काम मी सेवाभावनेने करतोय.
रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर रामभक्तांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
मी हे काम एकटा करतोय असे नाही, तर त्यामागे संघटित शक्ती आहे. एक रामसेवक म्हणून मी कार्य करतोय. सोमवार, दि. 22 जानेवारीचा सोहळा ‘न भूतो, न भविष्यत’ असा होणार आहे. अयोध्येत काम करत असतानाच याची प्रचिती येतेय. अयोध्येत कुणी घंटा तयार करून आणतंय, कुणी तूप, अगरबत्ती, गंगाजल, चांदीच्या खडावा, झेंडे अशा गोष्टी आणतंय. यातून हा राम आपल्या सर्वांच्या आयुष्यात कसा व्यापलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनात प्रभू राम, राम मंदिराविषयी किती प्रेम आहे, हे समजते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत या. रामलला भव्य मंदिरात विराजमान झालेले बघा आणि आनंद घ्या.
7058589767