आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव!
15 Jan 2024 15:28:26
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला. कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल त्यांनी दिला. या निकालानंतर आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाने राहूल नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राहूल नार्वेकरांनी दिलेल्या निकालात नेमकं काय?
आमदार अपात्रतेचा निकाल देताना ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारीणीकडे अंतिम अधिकार आहेत. शिवसेना प्रमुख कोणालाही पदावरुन काढू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार नाहीत. तसेच उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारणीचा पाठींबा नव्हता त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत असेही त्यांनी म्हटले.
भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच असून त्यांनी काढलेला व्हीपच योग्य आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. विधीमंडळ पक्ष ज्याचा असतो त्याचाच मुळ पक्ष असतो. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही. त्यामुळे आता शिंदेचा पक्षच मुळ शिवसेना राजकीय पक्ष असणार आहे, असा निकाल राहूल नार्वेकर यांनी दिला. दरम्यान, याप्रकरणी आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.