शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्यातर्फे ४० दिवसांच्या विशेष यज्ञाचे आयोजन

13 Jan 2024 17:38:06
Shankaracharya Vijayendra Saraswati

नवी दिल्ली
: श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपासून कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे काशी येथे विशेष यज्ञास प्रारंभ करणार आहेत. हा यज्ञ प्राणप्रतिष्ठेपासून पुढील ४० दिवस होणार आहे.

अयोध्येतील भव्य मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यावर चारही शंकराचार्यांनी बहिष्कार टाकल्याचा अपप्रचार काँग्रेससह पुरोगामी इकोसिस्टीमकडून केला जात आहे. मात्र, तामिळनाडूमधील कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी या अपप्रचारामध्ये तथ्य नसल्याचे सिद्ध केले आहे.

शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी गुरूवारी रात्री संदेशाद्वारे यज्ञाची माहिती दिली. ते म्हणाले, २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने काशीतील आमच्या यज्ञशाळेत श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपासून यज्ञास प्रारंभ केला जाईल. हा यज्ञ वैदिक विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून त्यामध्ये लक्ष्मीकांत दीक्षित यांचाही समावेश आहे. या काळात १०० हून अधिक पुजारी पूजा आणि हवन करणार आहेत, अशीही माहिती शंकराचार्यांनी दिली आहे.

शंकराचार्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचेही मुक्तकंठाने कौतुक केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील तीर्थक्षेत्रे आणि संकुलांच्या विकासावरही भर देत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली केदारनाथ आणि काशी विश्वनाथ मंदिरांचा विकास आणि विस्तार झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
Powered By Sangraha 9.0