'कारसेवकांवर गोळीबार करणे हा योग्य निर्णय'; सपा नेत्यांने पुन्हा ओकली गरळ!

10 Jan 2024 13:16:18
SP leader Swami Prasad Maurya controversial statement on Karsevak

नवी दिल्ली
: समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार स्वामी प्रसाद मौर्य हे हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधाने करत असतात. आता कारसेवकांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे ते चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी कारसेवकांना 'अराजक घटक' म्हणून संबोधले आणि तत्कालीन मुलायमसिंह सरकारच्या कारवाईचे समर्थन केले.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने कारसेवकांवर गोळीबार करण्याच्या आदेशाला क्लीन चिट दिली आणि ते म्हणाले, “जेव्हा ही घटना अयोध्येतील राम मंदिरात घडली होती. कोणत्याही न्यायालयीन निर्देशाशिवाय आणि कोणत्याही प्रशासकीय आदेशाशिवाय अराजक घटकांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. ”




ते पुढे म्हणाले, “संविधानाचे रक्षण करण्यासाठी, कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी तत्कालीन सरकारने गोळीबार केला होता. सरकारने आपले कर्तव्य बजावले आहे.नुकतेच केंद्रीय मंत्री आणि आग्राचे खासदार एसपी सिंह बघेल म्हणाले होते की, "सपा सरकारच्या काळात कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता, पण जर सपामधील कोणाला श्री राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला यायचे असेल तर त्याचे स्वागत आहे."

मौर्य यांना या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले, “एसपी सिंह बघेल हे आमचे खूप चांगले मित्र आहेत. त्यावेळी ते समाजवादी पक्षात होते. ज्यावेळेचा ते उल्लेख करत आहेत, त्यावेळी ते ही समाजवादी पक्षात होते. त्यामुळे त्यांनी त्या प्रकरणावर बोलू नये.स्वामी प्रसाद मौर्य यांनी असे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी त्यांनी रामचरितमानस संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. बौद्ध मठ पाडून हिंदू मंदिरे बांधली गेली, असेही त्यांनी म्हटले आहे.

३३ वर्षांपूर्वी १९९० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाच्या सरकारने हनुमान गढीकडे मोर्चा काढणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार केला होता. त्या काळात राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून लोक आणि संत अयोध्येला जात होते.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तेथे संचारबंदी लागू केली होती. बाबरी मशिदीपासून १.५ किलोमीटर अंतरावर बॅरिकेडिंग करण्यात आले. ३० ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवकांच्या अनियंत्रित जमावावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. २०१३ मध्ये मुलायम सिंह यादव यांनी या गोळीबारात मृत्यू झालेल्या कारसेवकांबद्दल दु:ख व्यक्त केले होते आणि त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले होते. कारसेवेच्या नावाखाली भाजपने अयोध्येत ११ लाखांचा जमाव जमवला होता, असे ते म्हणाले होते. देशाच्या एकात्मतेसाठी गोळ्या झाडाव्या लागल्या.



Powered By Sangraha 9.0