अर्जुन खोतकर पुन्हा जरांगेंच्या भेटीला; सरकारचं शिष्टमंडळ ही घेणार भेट

05 Sep 2023 11:55:07
 
Khotkar
 
 
मुंबई : जालना लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये आजही बंदची हाक देण्यात आली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. यातच, काल अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. तर, आजही अर्जुन खोतकर पुन्हा जरांगेंच्या भेटीलाआले आहेत.
 
सरकारचे प्रतिनिधी म्हणून अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये जाऊन आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करुन दिलं होतं. त्याचबरोबर आज सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे. मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज (५ सप्टेंबर) सरकारच्या शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
 
या शिष्टमंडळामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले हे आहेत. याआधीही गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र महाजन यांना यश आलं नव्हते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0