मुंबई : पनवेल येथे मालगाडी रुळावरून घसरली आहे. कळंबोली ते पनवेल ट्रॅकवर ही घटना घडली. पनवेलकडून वाशीकडे ही मालगाडी निघाली होती. मात्र या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पण या घटनेमुळे सध्या पनवेल मार्गावरून जाणारी एक्सप्रेसची वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊ शकतो.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेलहून दिवाकडे जाणाऱ्या अप मार्गावर हा अपघात झाला. तर डाऊन लाईन (दिवा ते पनवेल) सुरक्षित आहे. अपघातात या मालगाडीचे चार डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान दुसरीकडे, मुंबई - अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीबाबात दुपारी दोन वाजता एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई-अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीचे इंजिन डब्यांपासून वेगळे होऊन सुटून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. मात्र या घटनेत सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पंरतु या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तसेच या घटनेमुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प देखील झाली.