दि. २८ सप्टेंबर रोजी मुंबईसह संपुर्ण राज्यभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात होता. अशातच एक बातमी आली. ती म्हणजे, रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोला कारवाईचा दणका: ७२ तासांत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना! आणि ही बातमी ऐकून अनेकांच्या भुव्या उचवल्या,कारण पवार घराण्यासाठी हा मोठा धक्का होता. म्हणूनच बारामती अॅग्रो कंपनी काय काम करते? बारामती अॅग्रो ह्या कंपनीवर कारवाई का झाली? बारामची अॅगो आणि रोहित पवारांचे संबध काय आहेत?बारामती अॅगोचा इतिहास काय आहे?...
बारामती अॅग्रो कंपनी काय काम करते?हे आधी जाणून घेऊ. बारामती अॅग्रो लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रासाठी किफायतशीर उपाय पुरवते. त्यांची उत्पादने विशेषत: मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. ही उत्पादने सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य आहेत आणि शेतकरी त्यांचे पीक उत्पादन वाढवू शकतात. तसेच ही उत्पादने १०० टक्के सेंद्रिय आहेत, म्हणजे ती पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत आणि माती किंवा पिकांना हानी पोहोचवत नाहीत, असा दावा ही बारामती अॅग्रो कंपनीचा आहे. ही बारामती अॅग्रो कंपनी प्राणी आणि पोल्ट्री फीड मॅन्युफॅक्चरिंग, साखर आणि इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग, वीज निर्मिती, शेतीमाल, फळे आणि भाजीपाला आणि डेअरी उत्पादने या क्षेत्रात काम करते. पण आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईनंतर आता बारामती अॅगोच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान या आधीही बारामती अॅगोवर साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.गाळप हंगाम म्हणजे ऊसाची पूर्ण वाढ झाल्यानंतर साखर कारखान्यात त्याच्या रसापासून साखर तयार करण्याचा किंवा गुऱ्हाळ घरात गूळ तयार करण्याचा हंगाम म्हणजेच 'गाळप हंगाम' होय. हा हंगाम पावसाळा संपल्यावर सुरु होऊन मे पर्यंत असतो. ऊस शेतातून साखर कारखान्यात नेऊन तो गाळप करून साखर बनविण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे गाळप हंगाम होय.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, आणि आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले.मात्र, त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दि. 8 मार्च 2023 रोजी भिगवण पोलिसांत बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि या कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आणि त्यानंतर काल महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने रोहित पवारांच्या बारामती अॅगोवर कारवाई करत ७२ तासांत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आता बारामती अॅगोचा आणि रोहित पवारांचा संबध काय? आणि बारामती अॅगोचा इतिहास? जाणून घेऊया. रोहित पवार हे बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओ आहेत.तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. पशू खाद्य हे बारामती अॅगोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादनही तिथे घेतले जाते. बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीचे दोन कारखाने आहेत. ही कंपनी प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायाचे काम करते. २२ जून १९७१ रोजी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेची स्थापना झाली होती.
मग आता बारामती अॅगोवर कारवाई झाल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, "दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे २ वाजता बारामती अॅगोवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही, असे ही रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल,अशी टीका ही रोहित पवारांनी केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला बारामती अॅगोवरील कारवाईवर उत्तर देणं शरद पवारांनी टाळलं. तर तक्रारी असतील तर चौकशी करा, असं पवारच म्हणाले होते. त्यामुळे चौकशी केली. पण आता चौकशा केल्या की राजकारण होत असल्याचं म्हणतात, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. त्यामुळे नातू आजोबा वेगवेगळं बोलतात, दुटप्पी भुमिका कशाला? असा सवाल ही मुनगंटीवार यांनी केलायं.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला होता. पण ईडी, अर्थिक गुन्हे शाखा आणि आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीशीमुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोलल जात आहे.