मुंबई : इंडी आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेसला पत्र दिलं होतं पण उत्तर आलं नाही, असा दावा वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याआधी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटासोबत युती करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यजमान असलेल्या इंडी आघाडीच्या मुंबई बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना बोलवतील, असा अंदाज होता. पण उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना बोलावलं नाही.
वंचितला इंडी आघाडीत सामील करुन घेण्याला काँग्रेस आणि शरद पवार यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांवर सतत टीका करत असतात. त्यामुळे शरद पवार त्यांना इंडी आघाडीत सहभागी करुन घेण्यास उत्सुक नाहीत, असं बोलले जात आहे.
वंचित इंडी आघाडीत सामील होण्यासाठी उत्सुक आहे, पण काँग्रेसकडून वंचितला निमंत्रण मिळत नसल्याचं प्रकाश आंबडेकर यांनी सांगितलं. इंडी आघाडीत भाजपाचा विरोध करणाऱ्या देशभरातील २८ पक्षांचा समावेश आहे. या आघाडीच्या आतापर्यंत ३ बैठका पार पडल्या आहेत. पण अद्याप या इंडी आघाडीला आपल्या संयोजकाचे नाव ठरवता आलेले नाही. त्यासोबतच इंडी आघाडीमध्ये कशाप्रकारे जागावाटप केले जाणार याची कोणतीच चर्चा झालेली नाही.