मराठा आंदोलन : सगळं शांत सुरू होतं, अचानक जालन्यात नेमकं काय घडलं?

02 Sep 2023 18:23:04

Maratha Movement 
 
 
जालना : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलनादरम्यान पोलीसांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी त्यानंतर लाठीचार्ज केला. यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. मात्र, जालन्यात नेमकं काय घडलं? याची सुरुवात कुठून झाली? या प्रश्नाचा घेतलेला हा आढावा.
 
 
Maratha Movement
 
 
आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाल्या होत्या. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला. यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी दोघेही जखमी झाले आहेत.
 

Maratha Movement 
 
या घटनेचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, अनेक नेत्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांनी जालन्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा देखील केली आहे.
 

Maratha Movement 
 
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उदयनराजे भोसले यांनी जालन्यात जाउन आंदोलकाची व जखमींची भेट घेतली. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील जालन्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. "इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? हा जो अनुचित प्रकार घडला त्यासंबंधी चौकशी होईल. लाठीचार्ज करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. मराठा आंदोलकांना आरक्षण मिळायला हवं. खरंतर हे फार वर्षांपूर्वी व्हायला होतं. ज्यावेळेस अशाप्रकारचा अन्याय होतो त्यावेळेस उद्रेक होणं स्वभाविक आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, आपल्या शांततेत आंदोलन करायचं आहे." असं उदयनराजे म्हणाले आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0