(Dagdusheth Halwai Ganpati | Sarsanghachalak)
मुंबई : राज्यात धुमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले असून सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा मंगळवार, दि. १९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी सकाळी १० वा. बाप्पाच्या विधिवत पूजेला सुरुवात झाली. दरम्यान सरसंघचालकांनी गणेश चतुर्थीनिमित्त घेण्यात आलेल्या विश्वव्यापी संकल्पाबद्दल सांगत उपस्थितांसह भारतवासींना संकल्पपूर्तीसाठी संघटित होण्याचे आवाहन केले आहे.
सरसंघचालक यावेळी म्हणाले की, "संपूर्ण विश्वामध्ये शांती, सुबकता, परस्पर सौमनस्य नांदो यासाठी आज गणरायाचरणी प्रार्थना करण्यात आली आहे. भारतवर्ष परमवैभवसंपन्न होऊन विश्वाला नव्या सुखशांतीचा मार्ग दाखवणारा देश होवो, रोगराई शत्रुपीडा सगळ्यातून तो मुक्त होवो यासाठी आशीर्वाद मागितले आहेत. पुण्यापासून ते विश्वापर्यंतचा असा विश्वव्यापी संकल्प यावेळी करण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने आता वागण्याची गरज आहे. संकल्प सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. परंतु श्रींच्या सामर्थ्याला आपल्या एका काठीच्या आधाराची आवश्यकता आहे. करंगळीवर जरी गोवर्धन उचलला असला तरी त्यास आपली काठी लागण्याची गरज आहे. म्हणून या दिशेने आपण सगळ्यांनी आपले वर्तन केले पाहिजे. तरच श्रींच्या आशीर्वादाने हा संकल्प सफल होईल. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा!"