मुंबई : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सैन्य कारवाईचा आज ५ दिवस सुरु आहे. या कारवाईत आतापर्यंत ३ दहशतवादी मारले गेले आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला खडेबोल सुनावले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर सैन्य कारवाईत मारलेल्या गेलेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. यासोबतच त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. ते म्हणाले की,"भारताला शत्रू आहेत. या शत्रूंना भारताची प्रगती थांबवायची आहे, पण हा नवा भारत आहे. भारत माघार घेऊ शकत नाही. भारताने युद्धे पाहिली आहेत. आम्हाला युद्ध नको आहे, पण तुम्ही भारतासोबत युद्ध करायला गेलात तर तुमच्या मुलांना दुसरे कोणीतरी वाढवेल, हे जाणून घ्या."
अनंतनागच्या कोकरनाग जंगलात बुधवारपासून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सैन्य कारवाई सुरू आहे. कोकरनागमध्ये दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर लष्कराचे जवान आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्कराच्या तीन शूर जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.