मुंबई : अभिनेता सलमान खानचा 'रेडी', टायगर श्रॉफचा 'बागी' आणि अजय देवगणचा 'प्यार तो होना ही था' यांसारख्या चित्रपटांचे लेखक इकराम अख्तर यांना अटक करण्यात आली. एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांची मुरादाबाद तुरुंगात रवानगी करण्यात आली असून २२ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
इकराम अख्तर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली आहे. 'आय लव्ह दुबई' या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले असून 'रेडी', 'थँक्यू', 'नो प्रॉब्लेम', 'नई पडोसन', 'चलो इश्क लदाएं', 'जोरू का गुलाम', 'चल मेरे भाई', 'तेरा जादू चल गया' आणि 'छोटा चेतन' या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
मुरादाबाद येथील बांधकाम व्यावसायिक कुलदीप कात्याल यांनी इकराम अख्तरवर 'आय लव्ह दुबई' चित्रपट बनवण्यासाठी कात्याल यांच्याकडून दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. पैसे घेतले, पण चित्रपट पूर्ण केला नाही. दबावाखाली इकरामने दीड कोटी रुपयांचे धनादेश दिले पण तो बाऊन्स झाला. यानंतर कुलदीपने २०१६ मध्ये इकरामविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी २०१७ मध्ये इकराम अख्तरला अटक देखील करण्यात आली होती. मात्र, त्यांना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. तेव्हापासून आजतागायत ते या खटल्याच्या सुनावणीला हजर नव्हते.