मुंबई : अवघ्या काहीच दिवसांवर गणेशोत्सव आला असून राज्यभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या उत्सवासाठी महापालिका सज्ज झाली असून गणपती आगमन व विसर्जन तसेच उत्सवासाठी आवश्यक तयारी पालिकेने सुरू केली आहे. घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनच्यावेळी चौपाट्यांवर निर्माल्य कलश, विसर्जनस्थळांवर वीज व्यवस्थेकरिता विद्युत खांब यासाठी पालिका तयारी करत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना अधिकाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी ३०८ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. या तलावांचे व्यवस्थापन वॉर्ड स्तरावर कारण्यात येणार आहे.
यामध्ये भाविकांनी कृत्रिम तलावात मृर्तीचे विसर्जन करून पालिकेच्या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करू नये यादृष्टीने पालिकेचा हा निर्णय महत्वाचा आहे. तसेच विसर्जनस्थळी जमा होणारे निर्माल्य आणि इतर साहित्याच्या विल्हेवाटीसाठी पालिका भाड्याने टेम्पो घेणार आहे. यासाठी पालिकेने निविदा काढली आहे.