मुंबई : भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेअंतर्गत अवकाशात पाठवलेल्या आदित्य एल १ उपग्रहाने १५ सप्टेंबर, २०२३ रोजी पृथ्वी प्रदक्षिणेचा चौथा टप्पा म्हणजे 'अर्थ बाउंड मॅन्युव्हर' यशस्वीपणे पूर्ण केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. २ सप्टेंबर, २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल १चे प्रक्षेपण झाले होते. या उपग्रहाला लॅग्रेंज पॉइंटपर्यंत पोहचण्याकरत चार महिन्याचा कालावधी लागणार असून मोहिमेच्या चौदाव्या दिवशी चार अर्थ बाउंड मॅन्युव्हर यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.
आदित्य एल १ उपग्रहाचे पहिले अर्थ बाउंड मॅन्युव्हर ३ सप्टेंबर, २०२३ ला पूर्ण झाले. दुसरे अर्थ बाउंड मॅन्युव्हर ५ सप्टेंबर, २०२३ ला पूर्ण झाले. तर तिसरे अर्थ बाउंड मॅन्युव्हर १० सप्टेंबर, २०२३ रोजी पूर्ण झाले. चौथ्या अर्थ बाउंड मॅन्युव्हर नंतर आता पाचव्या प्रदक्षिणेला आदित्य एल १ तयार आहे. पाचव्या यशस्वी अर्थ बाउंड मॅन्युव्हर नंतर उपग्रह ११० दिवसांच्या प्रवासासाठी लॅग्रेंज पॉइंटकडे रवाना होईल.