मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होत असून आजपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.