मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'अखिल भारतीय समन्वय बैठक-२०२३' पुणे येथे होत आहे. ही बैठक पुढील तीन दिवस (दि. १४, १५, १६ सप्टेंबर) चालेल. या बैठकीस संघप्रेरीत असलेल्या एकूण ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 'पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन' या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. समन्वय बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव हे देखील उपस्थित होते.
या तीन दिवसीय बैठकीबाबत बोलताना आंबेकर म्हणाले, "संघाचे स्वयंसेवक आपल्या शाखा कार्याच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य अविरत करत असतात. त्याबरोबरच ते समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात सामाजिक कामांमध्येही मग्न असतात. स्वयंसेवकांकडून होणारी ही सर्व कामे समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी सुरू आहेत. समन्वय बैठकीत सहभागी होणार्या सर्व संघटना या संघप्रेरित असून सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात त्या स्वायत्तरितीने कार्य करत आहेत. वर्षातून एकदा या संघटनांची बैठक आयोजित केली जाते. दरम्यान या संघटनांकडून होणारे कार्य, समाजात वावरताना त्यांना आलेले अनुभव यावर चर्चा होते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान असल्याने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते."
पुढे ते म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून समाजजीवनात सक्रिय असणाऱ्या, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव बैठकीदरम्यान मांडतील. प्रत्येकाने मांडलेल्या विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन करण्यात येईल आणि त्यानुसार आगामी कार्याची दिशा काय राहील याचीही योजना यावेळी मांडण्यात येईल. सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारावर आधारित आर्थिक धोरण, त्याचबरोबर जातीभेद संपुष्टात येईल असा समरसतापूर्ण व्यवहार अशा अनेक विषयांवर बैठकीत विचारविनिमय होईल."
पुण्यात होणाऱ्या या बैठकीस रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहतील. यासोबतच राष्ट्र सेविका समिती, विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा सहभागी होतील. रा.स्व.संघाची समन्वय बैठक ही दरवर्षी होत असून गेल्या वर्षी ती छत्तीसगडमधील रायपूर येथे झाली होती.