चाकरमान्यांना दिलासा! कोकणात यंदा २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावणार
13-Sep-2023
Total Views |
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा विचार करता रेल्वे गाड्यांना वाढीव डबे लावण्यात आले आहेत. चार रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन डबे आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा कोकणात २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावणार असून, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०११६५/६ एलटीटी-मंगळुरू-एलटीटी एक्स्प्रेस (१६ फेऱ्या), गाडी क्रमांक ०११६७/८ एलटीटी-कुडाळ-एलटीटी एक्स्प्रेस (२४ फेऱ्या) रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५५/६ दिवा-चिपळूण-दिवा मेमूला (३६ फेऱ्या) प्रत्येकी चार डबे जोडण्यात येणार आहे. यामुळे आठ डब्यांची मेमू आता १२ डब्यांची धावणार आहे.
गाडी क्रमांक ०११५१/२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ०११७१/२ सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी या दोन्ही गाड्यांच्या २२ फेऱ्या २२ डब्यांच्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.