मानसिकता बदलतेय...

01 Sep 2023 21:44:16
Article On Pune City Traffic Congestion

पुण्यातील वाहतूककोंडीवर गेल्या दीड-दोन वर्षांपासून वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. तसेच वाहूतककोंडीमागील कारणांचाही शोध घेतला जात आहे. शहरातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन हजारो सूचनाही पुणेकरांनी दिल्या. नवीन उड्डाणपूल उभारले गेले. रस्तेदेखील विस्तारले. तरीही काही भागात स्थिती जैसे थे असल्यामुळे ही समस्या आहे, तशीच दिसून येते. तज्ज्ञमंडळीही पुण्याच्या वाहतूककोंडीवर उपयुक्त सूचना करीत असतात. मात्र, त्यांची अंमलबजावणी होतेच असे नाही. एकतर या महानगराचे आकारमान दिवसेंदिवस अतिशय वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्या आणि त्यासोबत वाहनसंख्यादेखील रोडावली आहे. पुण्यात आलो म्हणजे घरात दुचाकी किंवा चारचाकी वाहन हवेच, हा अट्टाहास, ही मानसिकता अजूनही कायम दिसते. पण, एक गाडी असावी, ही मर्यादादेखील बहुतांश पुणेकरांनीही कधीच ओलांडली. बहुतांश घरांत कुटुंबातील सदस्यनिहाय वाहने आहेत. त्यातही सगळी वाहने एकाचवेळी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे वाहनांची गर्दी या कोंडीसाठी पोषक ठरते. घरातील एक सदस्य चक्क कार घेऊन बाहेर पडतो आणि कोंडीत दोन दुचाकी वाहने आणि पादचार्‍यांची अडचण करीत असतो. अर्थात, हा त्याचा दोष आहे, असे नव्हे. त्यालादेखील वाहन घेऊन निघाला म्हणजे ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे, तेथे लवकर पोहोचणे हाच उद्देश असतो. मात्र, रस्त्यांवरील वाहनांची अमर्याद संख्या धावणारी आणि कडेलगत पार्किंगला असलेली वाहनेदेखील कोंडीत भर घालीत असतात, हे कुणाच्या लक्षात येत नाही, हा मुद्दाच नाही. वाहतूककोंडीवर उपाय शोधण्यासाठी आपणच का पुढाकार घ्यायचा, ही मानसिकता आडकाठी होऊन बसलेली दिसते.आता सुदैवाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक सक्षम आणि परिणामकारक पर्याय म्हणून मेट्रोची निवड पुणेकरांनी केल्याचे प्राप्त आकडेवारी बघता दिसते. मात्र, यामुळे लगेच वाहतूककोंडी सुटेल, असे मानणे अतिघाईचे ठरू शकते. तथापि, पुणेकरांनी आपापली वाहने घरी ठेवून रस्त्यावर न आणता, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास सुरू केला, तर कोंडीतून सुटका होत असल्याचे चित्र निश्चित दिसेल, अशी आशा.

दृष्टिकोन सुधारतोय...

समाजात असे अनेक घटक आहेत, जे केवळ विशिष्ट दृष्टिकोन बाळगून बसल्याने समस्या रेंगाळत राहिल्या. मात्र, जसा काळानुरूप बदल व्हायला हवा, अशा जाणिवा दृढ झाल्या. तेव्हा या दृष्टिकोनात हळूहळू सकारात्मक आश्वासक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘डिजिटल इंडिया,’ अशा माध्यमातून हा बदल समाजाने आनंदाने स्वीकारला.एकीकडे जे आजच्या मोदी सरकारवर तुटून पडतात, ते समाजात वावरताना ‘डिजिटल पेमेंट’चा पर्यायही आवर्जून स्वीकारतात. आपल्या भागातील लोकांना ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आग्रहाने सहकार्य करतात. त्यात त्यांची व्होट बँक पक्की करणे, हा स्वार्थ असतो. पण, आपण मोदींनी स्वीकारलेला मार्ग अंगीकारत आहोत, हे त्यांना अशा कृतीतून कबूल करणे भाग पडते. ही वस्तुस्थिती कोणीच नाकारणार नाही. दृष्टिकोन सुधारणे, ही प्रक्रिया सकारात्मक गोष्टींसाठी लक्षात घेतली आणि यात कोणतेही राजकारण मिसळले नाही, तर काळानुरूप बदल किती गरजेचे आहे, हे मान्य केले पाहिजे. शिक्षण, उद्योग, व्यवसाय आणि कृषी क्षेत्राच्या बाबतीत अलीकडील काळात सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट होत असल्याचे लक्षात येईल. शेती करताना केवळ सवलती आणि कृषी कर्ज माफीवर विसंबून न राहता, आजचा शेतकरी स्वतःमध्ये बदल घडवून आणताना दिसतो. आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याची त्याला गरज भासत नाही. एवढे मानसिक बळ त्याच्यात केवळ दृष्टिकोन सुधारला म्हणून आले आहे. शिक्षणाच्या बाबतीतदेखील आता पालक आणि पाल्य यांच्यातील कोणत्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, यावर घराघरात योग्य मंथन होताना दिसते. आधी केवळ नोकरीसाठी शिक्षण घेणारा हा वर्ग आता काळानुरूप दृष्टिकोन अंगीकारत कौशल्य आधारित शिक्षणासाठी आग्रही असल्याचे लक्षण म्हणजे त्याचा दृष्टिकोन सुधारतोय, असेच म्हणावे लागेल. स्वच्छतेच्या बाबतीत एकेकाळी बदनाम असलेला भारत आता स्वच्छता आणि विशेषतः प्रदूषणाविषयी जागरूक होत असल्याचे लक्षात येईल. नाही म्हणायला समाजातील एक वर्ग अजूनही अस्वच्छ मानसिकतेचा रोग उराशी बाळगून आहे, ही शोकांतिका असली, तरी इलेक्ट्रिक वाहनधारकांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेता समाजातील एका घटकाला प्रदूषण नकोय, हे सिद्ध होते.

अतुल तांदळीकर
 
Powered By Sangraha 9.0