हिंदू, औरंग्या आणि ‘अडगळी’तले नेमाडे

06 Aug 2023 22:08:13
Editorial On Author Bhalchandra Nemade Statement In Mumbai Marathi Library Programme

‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना औरंग्याची भलावण केली. ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शरद पवार. खरं तर अशा संस्था हाताशी धरून आपले ‘नरेटिव्ह’ सेट करण्यात पवारांचा तसा हातखंडाच. मात्र, आता खरा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे हजारो मार्ग उपलब्ध झाल्याने नेमाडेंसारख्या प्रवृत्ती तोंडघशीच पडतात!

“पुस्तक वाचन केल्यामुळे आपल्याला इतिहासाबद्दल योग्य माहिती मिळत गेली,” असे सांगणार्‍या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी, खरं तर त्यांनी कोणत्या लेखकांची इतिहासाची पुस्तके वाचली, ते स्पष्ट केले असते, तर बरे झाले असते. ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’चे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नेमाडे यांनी जी मुक्ताफळे उधळली, ती सर्वस्वी निंदनीय असली, तरी नेमाडेंच्या लौकिकाला साजेसी अशीच! भारतावर पारतंत्र्य लादणारे इंग्रज नेमाडे यांना जवळचे वाटतात. इंग्रजी भाषेला मात्र ते विरोध करतात. परस्परविरोधी भूमिका घेणार्‍या नेमाडेंवर शाब्दिक आसूड ओढावेत की, त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे भरलेले जाहीर प्रदर्शन पाहून त्यांच्या बुद्धीची कीव करावी, हाच खरा प्रश्न. काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणास न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर औरंग्याची भलावण करायला कोणी ना कोणी पुढे येणारच, हा विश्वास नेमाडे यांनी सार्थ ठरवला. त्यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’ने गौरवण्यात आले आहे. त्याबद्दल नेमके कोणते निकष वापरले गेले? याची माहितीही सर्वांना मिळायला हवी. इतिहास वाचायला हवा; पण तो नेमाडेंसारखा पिवळ्या पुस्तकातील नको, हेही तितकेच खरे.

चर्चेत राहणे ही नेमाडेंची गरज. मात्र, तेथे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या शरद पवारांची, अशी कोणती अपरिहार्यता होती, म्हणून त्यांनी औरंग्याबद्दलची धादांत खोटी माहिती आणि कोटी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशी येथील श्रीविश्वनाथ मंदिराबद्दल जे अपशब्द उच्चारत होते, ते त्यांनी शांतपणे ऐकून घेतले? इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी नेमाडेंनी केलेल्या अपप्रचाराचे लगेचच सप्रमाण खंडन केले आहे. काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग करून डाव्या विचारसरणीच्या हाती संस्था सोपवल्या होत्या. त्यानुसारच नेमाडेंसारख्या प्रवृत्तींना पदे, पुरस्कार, शिष्यवृत्ती यांची खिरापत वाटण्यात आली. काँग्रेसने आपल्या सोयीचे राजकारण करावे आणि डाव्यांनी आपले विचार समाजमनात रुजवावेत, असे हे साटेलोटे. म्हणूनच २०१४ मध्ये केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर देशातील समस्त विचारवंतांना देशात ‘असहिष्णुता’ वाढीस लागल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यातूनच ‘पुरस्कारवापसी’ करण्यात आली, याचे विस्मरण आम्हाला झालेले नाही. म्हणूनच शरद पवार यांच्या उपस्थितीत विचारांची विषवल्ली रुजवण्यात आली, याचेही फारसे आश्चर्य वाटत नाही.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा जो प्रसार केला होता, त्याबद्दल कोणाच्याही मनात काडीचीही शंका नाही. मात्र, नेमाडे यांनी शिवशाहीर पुरंदरे यांच्याबद्दल २००४ मध्ये गैरशब्द वापरले होते. “शिवाजी महाराजांचा केवळ हिंदुत्ववादी म्हणून प्रचार केला गेल्याने इतिहासकारांनी तिरप्या पद्धतीने ही चुकीची भिंत आता त्यांच्यावरच कोसळत आहे,” असे नेमाडे म्हणून जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचीच स्थापना केली होती, हे वास्तव. शरद पवारांनीही ते पुण्यात मान्य करून झालेले आहे. मात्र, नेमाडे यांना ‘हिंदवी स्वराज्य’ ही संकल्पनाच मान्य नाही. ब्राह्मण आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वर्चस्वामुळे हिंदू समाज उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी हिंदू धर्माचा चुकीचा अर्थ लावून समाजाचा नाश केला, असा आरोप नेमाडेंनी २०१० मध्ये केला होता.

हिंदूंचे मुस्लिमांशी जिव्हाळ्याचे नाते होते, त्यासोबतच जगभर एक अनोखी संस्कृती विकसित केली असल्याचा शोधही त्यांनी याच काळात लावला होता. तसेच, ‘स्वतःला हिंदू म्हणवून घेणे, ही शरमेची बाब झाली आहे,’ असे नेमाडे म्हणतात. तेच नेमाडे ‘हिंदू’ नावाच्या कादंबरीतून काहीतरी ‘अडगळ’ मांडतात, त्याला पुरस्कार मिळतो की, हा पुरस्कार मिळावा म्हणूनच नेमाडे यांनी स्वतःला हिंदू असल्याची लाज वाटते, अशी जाहीर कबुली दिली होती? हिंदू म्हणवून घेण्याची जर नेमाडेंना लाज वाटत होती, तर त्याचवेळी त्यांनी आपले हिंदू नाव त्यागून इस्लामचा त्यांनी का स्वीकार केला नाही? नेमाडेंना इस्लाम जवळचा वाटतो, तर त्यांनी इस्लामी देशांतच वास्तव्यास का जाऊ नये? संस्कृत भाषेला जगभरात मान्यता मिळत असताना, नेमाडेंना मात्र संस्कृत ही दुय्यम भाषा असल्याचा साक्षात्कारही झाला होता. त्यांची ‘कोसला’ ही कादंबरी पलायनवादाचे उत्कृष्ट उदाहरण ठरावी.

१९६३ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी महाविद्यालयीन तरुणाचे पांडुरंग सांगवीकरचे जीवन रेखाटणारी आहे. हा पांडुरंग सांगवीकर गावाकडून शिक्षणासाठी म्हणून पुण्यात आला आहे. असे म्हणतात की, नेमाडेंनी स्वतःचेच चित्रण यात केले आहे. जुन्या-नव्या शैलीचा वापर करत अनौपचारिक भाषेचा केलेला प्रयत्न, त्या काळातील नव्या पिढीला आकर्षित करणारी ठरली. महाविद्यालयीन शिक्षणापासून ते व्यवहारी जगात अपयशी ठरलेला पांडुरंग सांगवीकरचे उदात्तीकरण यात करण्यात आले, तेही ठीक. तथापि, त्यांच्या ‘हिंदू’ कादंबरीत करण्यात आलेली हिंदू धर्मावरची टीका, ही कोणत्याही परिस्थितीत क्षम्य नव्हतीच. नेमाडेंचा ‘इतिहास’ तपासून पाहिला असता, सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेचा रोख आपल्याकडे कसा राहील, याची काळजी त्यांनी घेतलेली दिसून येते. सहिष्णू हिंदू त्याच्या धर्मावरील टीकाही सहन करतो, याचा नेमका फायदा नेमाडेंसारखी मंडळी घेतात. १९७४ पासून सातत्याने हिंदू धर्माविरोधात राळ उडवणे नेमाडे यांना म्हणूनच शक्य झाले. राजकारण्यांचा तिरस्कारही नेमाडे यांनी केला, हे विशेष महत्त्वाचे.

काँग्रेसी काळात चुकीचा इतिहास मांडला गेला, त्याला सरकार दरबारी मान्यता मिळाली. हातातल्या संस्था आणि तिच्या पदांवरील डावे पूर्ण क्षमतेने काम करत असल्यानेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रखर भक्तावर टीका करण्यात धन्यता मानणारा, पिवळ्या पुस्तकातून औरंग्याची भलावण करणारा चुकीचा इतिहास मांडणारा वर्ग महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. या पिवळ्या पुस्तकांतून छत्रपती शिवाजी महाराजांना निधर्मी म्हणून दाखवण्यात आले. मुस्लिमांचे उदात्तीकरण करण्यात आले. अशा पुस्तकांना राजमान्यता देणे किती योग्य? हे नेमाडेंच्या मुंबईतील बेलगाम बोलण्यावरून पुरेसे स्पष्ट झाले आहे. नेमाडेंसारख्या विकृती काय बोलल्या, यापेक्षा त्या कुठे आणि का बोलल्या, याचा शोध घेणे जास्त गरजेचे आहे. पवारांच्या कारकिर्दीत उदयास आलेली ही विचारसरणी आता निष्प्रभ ठरत आहे. काशी येथील ज्ञानवापीचे सत्य सर्वेक्षणानंतर काही दिवसांतच जगासमोर येणार आहे. त्याची धास्ती असल्यानेच नेमाडेंना बोलते करण्यात आले का? हा प्रश्न आहे.



Powered By Sangraha 9.0