मेरी माटी मेरा देश : सन्मान शूरवीरांचा

"या" तारखेपासून होणार सुरुवात

    05-Aug-2023
Total Views |

meri mati mera desh


मुंबई :
संपूर्ण देशभर देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलकही (स्मारक फलक) बसवण्यात येणार आहेत. तसेचअमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणार आहे.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच त्यांच्या “मन की बात” प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेद्वारे शूरवीरांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमृत सरोवरांजवळील ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. नवी दिल्लीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण तसेच दूरसंचार विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा, सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन आणि युवा व्यवहार सचिव मीता राजीवलोचन यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी हेदेखील उपस्थित होते.
 
‘मेरी माटी मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल असे पत्रकार परिषदेत माहिती देतांना अपूर्व चंद्रा म्हणाले. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या “हर घर तिरंगा” या देशव्यापी अभियानाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ हा आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे , मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे “मेरी माटी मेरा देश” या मोहिमेचे प्रमुख घटक असल्याचे अपूर्व चंद्रा यांनी स्पष्ट केले.
 
‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत ९ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल, सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी सांगितले. दिल्लीत देशाच्या कानाकोपऱ्यातून ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतिक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सर्वांच्या सहभागामुळे गेल्या वर्षी “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वी झाला होता. यावर्षी देखील, १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करू शकतात, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव मीता राजीवलोचन यांनी दिली.
 
यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीच्या इतर डिजिटल व्यासपीठाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या प्रसारमाध्यमांवरच्या प्रसारणाची माहिती दिली. ९ ऑगस्ट रोजी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम सुरू होईल आणि १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम १६ ऑगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका/ नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. ३० ऑगस्ट २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे.