मुंबई : चीनने भारताचे अविभाज्य अंग असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग आपल्या नकाशात दाखवला आहे. चीनच्या या कृत्याची भारताने तीव्र शब्दात निंदा केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "चीनला असे नकाशे जारी करण्याची सवय आहे. असे दावे करून इतरांचा प्रदेश आपला होत नाही. भारताच्या काही भागांसह नकाशा जारी केल्याने काहीही बदलणार नाही."
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत एस जयशंकर यांनी चीनला कडक संदेश दिला. दुसरीकडे, पाकिस्तानबाबत एस जयशंकर म्हणाले की, "काश्मीरचा वापर आमच्यावर दबाव टाकण्यासाठी करण्यात आला. कलम ३७० रद्द करणे ही आमची सर्वात मोठी उपलब्धी आहे. आजही पाकिस्तान याबद्दल बोलत राहतो, पण जग त्याबद्दल का बोलत नाही. तोट्याच्या स्टॉकमध्ये कोण गुंतवणूक करणार हे स्पष्ट आहे."
चीनच्या सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने एक नकाशा जाहीर केला होता. या नकाशात भारताचे अविभाज्य अंग असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि लद्दाखचा काही भागावर चीनने दावा केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे.