रोगाचे मूळ जेव्हा आई किंवा वडिलांपासून मुलांमध्ये अनुवांशिकदृष्ट्या येते, तरीही असे दिसून येते की, आई-वडिलांच्या दोन मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसून येतात. म्हणजेच काय ROOTS किंवा मूळ जरी एक असले तरी मुलांना होणारे आजार हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणजेच जी आजाराची स्थिती रुग्णामध्ये पाहिली जाते, ती कुठले मूळ सक्रिय आहे व कुठले घटक हे या स्थितीला उत्तेजता देणारे आहेत, हे पाहणे फार गरजेचे असते. हे उत्तेजित करणारे घटक आजाराच्या स्थितीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. ज्यावेळी एखाद्या केसमध्ये आई व वडील या दोन्हीकडील मुले सक्रिय असतात, अशावेळी या ठरावीक उत्तेजित करणार्या घटकांमुळे रुग्णाचा अभ्यास करणे अतिशय सोपे जाते.
ज्यावेळी स्त्रीला गर्भधारणा होते, त्यावेळी आई व वडिलांची जी भावनिक स्थिती व प्रसंगानुरुप शारीरिक व मानसिक बदल जे झालेले असतात, त्या बदलांचा थेट परिणाम हा गर्भावर होऊन त्या गर्भाची स्वत:ची अशी एक स्थिती व मूल हे वेगवेगळं असते व परिस्थितीजन्य घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. या मूळ कारणाची ताकद ही स्थिती किती काळापासून आहे, यावर अवलंबून असते किंवा कुटुंबातील किती लोकांना (रक्तांच्या नात्यातील) ही स्थिती होती? जर ही स्थिती अनेक पिढ्यांकडून पुढच्या पिढीकडे पाठविली जात असेल, तर रोगाचे मूळ हे खूप मजबूत असते. या मुळांची उत्तेजित होण्याची शक्ती ही किती वेळा आधी ही स्थिती उत्तेजित झाली आहे, त्यावर अवलंबून असते. मूळ कारणाचे उत्तेजित होणे म्हणजे, बाहेरील घटकांचा मूळ कारणावर प्रभाव पडून त्याला उत्तेजना मिळणे होय. जर सतत रोगप्रवण स्थिती उत्तेजित होत असेल, तर रोगाचे मूळ कारण सतत उत्तेजित होत असते. त्यामुळेच आईची गरोदरपणातील स्थिती ही बाळाचे उत्तेजित झालेले मूळ असते.
उदाहरणार्थ, एखादी मनाने खंबीर व धीट असलेली स्त्री, जर गरोदरपणात काही कारणाने अतिशय ताणतणावाखाली असेल किंवा खूप भित्री झाली असेल, तर ती खंबीर व धीटपणाची स्थिती पुढे बाळामध्ये न येता उत्तेजित झालेले भित्रेपणाचे व ताणतणावाचे मूळ त्या बाळामध्ये येते व तशी लक्षणे दाखवते. माझ्या क्लिनिकमध्ये येणारी एक मुलगी गरोदरपणात असताना खूप घाबरली होती. तिथे एका मुलाला उंच इमारतीवरून उडी मारताना पाहिले होते. त्यामुळे ती फारच घाबरली होती. ही तिची स्थिती पूर्ण प्रेगनन्सीमध्ये तशीच राहिली होती व त्यामुळे जेव्हा बाळ जन्माला आले ते अतिशय भित्रे होते व सतत त्या बाळाला पाळण्यात ठेवले की ते रडायचे. जरा मोठे झाल्यावर उंचीची त्याला भीती वाटू लागली. उंचावर जायला ते मूल तयार नसायचे, याचा अर्थ असा की, आईच्याकडून भीतीची स्थिती व मूल जे त्यावेळी उत्तेजित झाले होते, ते तसेच्या तसे त्या बाळाकडे परावर्तित झाले व त्यामुळे बाळाची स्थिती तशी तयार झाली. रोगाचे मूळ अशाप्रकारे ट्रान्सफर होते, म्हणून होमियोपॅथीमध्ये डॉक्टर फार खोलवर जाऊन रुग्णाची चौकशी करतात व माहिती मिळवतात. (क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६