मुंबई : दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखान्यावर साखर आयुक्तांकडून कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे देयक थकवल्या प्रकरणी साखर आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात भीमा पाटस सहकार साखर कारखान्याचे साहित्य जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी गाळप केलेल्या उसाचे एकूण ५ कोटी ७५ लाख रुपयांहून अधिकचे देणे भीमा साखर कारखान्याकडे प्रलंबित होते. याबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सदरील कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कारखान्याची पाहणी करण्यासाठी थेट कारखाना स्थळालाही भेट दिली होती. कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हे सद्यस्थितीत दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत.