मुंबईला पाणीपुरवठा करणारा कोणताही प्रमुख तलाव सध्या 'ओव्हरफ्लो' नाही !
19 Aug 2023 17:23:34
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे तलाव हे ओसंडून वाहत असल्याच्या अर्थात 'ओव्हरफ्लो' होत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांद्वारे व काही प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहेत. तर काही माध्यमांद्वारे मुंबईची पाण्याची चिंता मिटली असल्याचा आशय मांडणाऱ्या बातम्या प्रसारित होत आहेत. दरम्यान यासंदर्भात मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
विहार तलाव १०० टक्के व तुळशी तलाव ९९ टक्के भरलेला आहे. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या एकंदरीत पाणीपुरवठ्याचा विचार करता विहार व तुळशी तलावांमधील 'जलसाठा' हा अत्यल्प आहे. त्यामुळे या दोन तलावांमधील पाणीसाठ्याच्या आधारे व्यापक निष्कर्ष काढणे योग्य होणार नसल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रमुख तलावांपैकी सर्वात मोठे तलाव असणाऱ्या 'अप्पर वैतरणा' तलावातील जलसाठा ७१.०९ टक्के आहे. तर भातसा तलावातील जलसाठा ७८.१६ टक्के आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये एकंदरीत जलसाठा हा ८३.५१ टक्के आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईची पाणी चिंता ही काही प्रमाणात निश्चितपणे दूर झाली असली, तरी अद्याप पूर्णपणे मिटलेली नसल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते, असेही जल अभियंता खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.