माझा देश, माझे कर्तव्य

    19-Aug-2023
Total Views |
Article On Indian Peoples Should Follow Fundamental Duties

नुकताच आपण भारताचा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहात साजरा केला. पण, हे करताना आपण नागरी कर्तव्यांचे किती पालन करतो, हा प्रश्नदेखील प्रत्येकाने स्वतला विचारायला हवा. कारण, कुठलाही देश महाशक्ती बनण्यामध्ये देशाच्या सामान्य नागरिकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो. महाशक्ती असलेल्या देशांचे नागरिक कायदे पाळतात, नियम पाळतात. त्यांचे देशावरती प्रेम असते आणि हे प्रेम ते कृतिशील जबाबदार नागरिक बनून व्यक्तदेखील करतात. देशाकडून काही मागण्यापेक्षा, मी देशाकरिता काय करू शकतो, यावर त्यांचा जास्त भर असतो. असे असेल तर भारतीय देशाप्रती आपल्या जबाबदार्‍या पूर्णपणे निभावत आहे का? तर दुर्देवाने आज त्याचे उत्तर नाही असे आहे.

जबाबदार नागरिक बना!

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, भडकावू पोस्ट सोशल मीडियावर टाकू शकतो. त्यामुळे हिंसाचार झाला, तरी पर्वा नाही, अशी काहींची मानसिकता दिसून येते. भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बर्‍याच वेळेला या कर्तव्यांकडे अनेक दुर्लक्ष करतात.सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा बहुतेकांना विसर पडतो. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे, जागा मिळेल तिथे मलमूत्र विसर्जन न करणे, सार्वजनिक अस्वच्छता हा नवीन विषय नाही. कारमधून रस्त्यावर प्लास्टिक आणि शीतपेयांच्या बाटल्या भिरकावल्या जातात, किनार्‍यावर दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच असतो आणि हे सगळे आपल्यातलेच काही सुशिक्षित लोक करतात. परिसर स्वच्छ ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे, आपल्याकडील कचरा सर्रास रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आपण टाकतो. ‘येथे स्वच्छता राखा’ असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्‍याचा डोंगर असतो. म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा आहे.

पान खाऊन चहूकडे थुंकणे, तर काहींचा छंद आहे. कानीकपाळी ओरडून, दंड आकारूनसुद्धा हे ऐकत नाहीत. आपण इतके बेजबाबदार आहोत की, काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी सरकार जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढतो. आज प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही. पण, तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रूप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात, तरीही हा नियम अनेक पायदळी तुडवतात. आपण जबाबदार नागरिक का बनत नाही?

शहरांमधील वाहतुकीला शिस्त लावा

वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जातात, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे, अगदी छातीटोकपणे आपल्याकडे केले जाते. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर, हेच आपले दुर्दैव आहे.रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत नाचणं, वेगवेगळ्या मिरवणुका काढून शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी अजून कठीण करणे चालूच आहे. रस्त्याने नीट आणि वेग मर्यादित ठेवून वाहन चालवणे, रस्ता क्रॉस करणार्‍यांना रस्ता ओलांडू देणे, आपल्या वाहनाची धडक बसून कोणी जखमी होणार नाही, मरणार नाही, अशी सावधगिरी बाळगणे जरुरी आहे. शहरांमधील रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम केली जावी. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोर करावे, यासाठी वाहतूक पोलिसांची मजबूत फळी असावी. वाहतूक नियम तोडणार्‍या नागरिकांना शिक्षा द्यावी. वाहतुकीचे नियम पाळून आपण प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलची बचत करू शकतो आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मदत करू शकतो.

हिंसक आंदोलनाचा मोठा दुष्परिणाम देशावर

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात, ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. शहरात हिंसाचार, दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले, त्यामुळे देशाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी संपत्ती, राज्य परिवहनच्या बसेस, खासगी वाहने आणि खासगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. ’एसटी’ हे गरीब जनतेच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे ‘एसटी’ नुकसानीचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा गरिबांवर होतो. शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. रोजची रोटी रोज कमावणार्‍यांना रोजीरोटी मिळत नाही. आजारी पडलेल्याना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे जाता येत नाही. प्रवासाकरिता गावाच्या बाहेर पडलेल्यांचे रस्ते बंद पडतात.

राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. दिल्लीत झालेल्या तथाकथित शेतकरी आंदोलनामुळे दोन रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रेटर दिल्लीचे रोज हजारो कोटी रुपयांची नुकसान होत होते. एवढे नुकसान कुठल्याही प्रकारच्या दहशतवादामुळे झालेले नाही. हिंसक आंदोलने हा दहशतवादाचा प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करून घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे. येत्या २०२३-२४ मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था, अनेक राजकीय पक्ष जबाबदार आहेत. मणिपूर मधल्या हिंसाचारामध्ये मैतेई जमातीला कुकी जमातीचे नुकसान आणि कुकी जमातीला मैतेयी जमातीचे नुकसान भरण्यास भाग पाडले पाहिजे. टीव्ही मीडिया, सोशल मीडिया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विनाकारण अतिरेकी प्रसिद्धी देतात. हिंसाचाराच्या बातम्यांना पान एक वरून काढून पान क्रमांक आठवर नेले पाहिजे.

नागरिकांचा सहभाग

सामान्य माणसांनी पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे. कायदा-सुव्यवस्था राखणे, ही पोलिसांची जबाबदारी असली, तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसांना ते सक्षमपणे करता येणार नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी आणि नागरिकांना येणार्‍या अडचणींवर मात केली जावी. अनेकदा पोलीस कारवाई करूनही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करून कायदा-सुव्यवस्था राखली जाऊ शकते. स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक ’टोल फ्री’ फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोनवरून हिंसक घटनेचे चित्रण करून पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरून हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.

आपापलं काम व्यवस्थित करणं, हीच देशभक्ती

रस्त्यावरील सिग्नल पाळणं, रस्त्यावर न थुंकणं, स्त्रियांचा आदर करणं, दिलेली वेळ पाळणं, भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं, आपल्याआधी लोकांचा विचार, जात आणि प्रांतवादाचा पुरस्कार न करणं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे. मतदान करणं, योग्य उमेदवार निवडणं, ही देशभक्ती आहे. मात्र, ५० टक्के भारतीय निवडणुकांमध्ये मतदान करत नाही आणि मतदान दिवस सुट्टीचा दिवस म्हणून मजा करण्यामध्ये घालवतात. स्वतःच्या क्षेत्रामध्ये वैध मार्गाने यशस्वी होणे, वाद न घालता काम करणे, ही देशभक्ती आहे, गतकाळातील गोष्टींवर वाद न घालणे, स्वतःच्या कर्तव्यांप्रती जागरूक असणे, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणे, सार्वजनिक विकास कामांना अडथळा निर्माण करून देशाचा विकास थांबवणे, सध्या जोरात सुरू आहे. स्वतःपलीकडे पाहणे आणि खरं सांगायचं तर सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करणे ही देशभक्तीच आहे. सरकारी कार्यालयात काम नियमानुसार करणे, अचानक बंद पुकारून सामान्य माणसांना वेठीला न धरणे, ’वरकमाई’चा मोह न धरणे ही देशभक्ती आहे.

प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं, हीच आजच्या काळातली देशभक्ती ठरेल.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन